नवी मुंबई : ऐरोलीतील सेक्टर-१मध्ये असलेले जुने वडाचे झाड अविरत कोसळणाºया पावसामुळे रस्त्याच्या कडेला झुकले आहे. कोणत्याही क्षणी कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. या प्रकाराकडे महापालिकेच्या संबंधित विभागाने सपशेल दुर्लक्ष केल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.गेल्या आठवड्यात एका पादचारी महिलेच्या अंगावर नारळाचे झाड पडल्याने त्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना चेंबूर येथे घडली होती. या घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर सर्व स्तरांतून टीका होत आहे. या दुर्घटनेतून नवी मुंबई महापालिकेने कोणताही धडा घेतल्याचे जाणवत नाही.विशेष म्हणजे, यावर्षी महापालिकेकडून मान्सूनपूर्व वृक्ष छाटणी योग्यरीत्या झालेली नाही. यातच यंदा पावसाने जोर धरला आहे. मागील दीड महिन्यापासून जोरदार वाºयासह पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. ऐरोली सेक्टर-१मध्ये मुख्य रस्त्याच्या लगत एक पुरातन वडाचे झाड आहे. अनियंत्रित वाढलेला हा वटवृक्ष मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या दिशेने झुकलेला आहे. बुंध्याजवळील जमिनीशी असलेली मुळाची पकड सैल झाल्याने हे झाड कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या रस्त्यावर पादचाºयांची मोठी वर्दळ असते. तसेच या वडाच्या अगदी टप्प्यात दुकाने व निवासी गाळे आहेत. मुसळधार पावसात हे झाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथून जा-ये करणाºया रहिवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे.मुंबईच्या चेंबूरमधील दुर्घटनेपासून बोध घेऊन महापालिकेने तातडीने या वडाच्या झाडाची छाटणी करावी किंवा ते तोडून टाकावे, अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. दरम्यान, महापालिकेच्या माध्यमातून शहरातील धोकादायक झाडांची छाटणी करण्याचे काम सुरू आहे. ऐरोलीतील त्या वडाच्या झाडाची पाहणी करून आवश्यकतेनुसार त्याची छाटणी किंवा तोडून टाकण्याची कारवाई केली जाईल, असे महापालिकेच्या संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ऐरोलीतील पुरातन वटवृक्ष कोसळण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:27 IST