ऑनलाइन टीम
नवी दिल्ली,दि. १८ - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आम आदमी पक्षाच्या आमदारांनी दिल्लीत पुन्हा स्थापन करण्याची मागणी पक्ष नेत्यांकडे केली आहे. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस किंवा भाजपचा पाठिंबा घ्यावा असे आपच्या आमदारांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागांवर आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर आपच्या आमदारांनी दिल्ली विधानसभेत पुन्हा सत्ता स्थापन करण्याची मागणी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे. भाजप किंवा काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करावी असे या नेत्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनेही सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा आपशी हातमिळवणी करण्याची तयारी दर्शवली आहे.
दिल्लीत आपचे २८ आमदार असून भाजपचे ३२ आमदार आहेत. तर काँग्रेसचे सात आमदार निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेसाठी ३६ ची मॅजिक फिगर गाठणे गरजेचे असते. डिसेंबरमध्ये निवडणूक झाल्यावर आपने काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सत्तास्थापन केली होती. मात्र अरविंद केजरीवाल यांनी लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावरुन ४९ दिवसांत सत्तेवरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता.