नवी दिल्ली : भारत हा दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही, असे ठणकावून सांगत भारत हा माणुसकी जोपासणारा देश आहे, तर पाकिस्तान हा दहशतवाद पोसणारा देश असल्याचा अप्रत्यक्ष हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात चढवला, तसेच पाकव्याप्त काश्मीर-गिलगिट, बलुचिस्तान पाकच्या ताब्यातून मुक्त होण्याचे समर्थन करत काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करणाऱ्या पाकला जशास तसे उत्तर देण्याचा सूचक इशाराही मोदी यांनी दिला.देशाच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनी सोमवारी दिल्लीत लालकिल्ल्यावरून देशाला संबोधून केलेल्या या भाषणात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. तब्बल दीड तास चाललेल्या या भाषणाचा रोख व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यावर आणि सुराज्य प्रस्थापित करण्यावर होता. गेल्या दोन वर्षांतील सरकारच्या कामगिरीमुळे व्यवस्थेत आणि सामान्य माणसाच्या जीवनात कशा प्रकारे बदल झाले आहेत, हे त्यांनी जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा दाखला दिला. मोदींनी पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले. शेजारच्या देशाने आमच्याशी लढण्यापेक्षा गरिबीशी लढावे. कारण गरिबीतून मुक्तता हेच सर्वात मोठे स्वातंत्र्य आहे. हिसेंतून कोणाचेही भले होत नाही. भारत हिंसा, दहशतवाद आणि माओवादापुढे कधीच झुकणार नाही, असे मोदींनी ठणकावून सांगितले. भारतातील प्रत्येकाला पेशावरच्या लष्करी शाळेत झालेल्या निष्पाप बालकांच्या हत्यांचे वृत्त ऐकून दु:ख झाले, असे ते म्हणाले. बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील रहिवाशांनी माझे आभार मानले, ही सन्मानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)सुराज्याची जबाबदारी देशातील नागरिकांचीहीभारताला प्राप्त झालेल्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करणे, ही देशातील १२५ कोटी नागरिकांची जबाबदारी आहे. देशापुढे असलेल्या अनेक समस्या सोडवण्याचे सामर्थ्य भारतीयांकडे आहे. गेल्या दोन वर्षांतील सरकारच्या कामगिरीमुळे व्यवस्थेत आणि सामान्य माणसाच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.विविधतेत एकता हेच भारताच्या एकात्मतेचे मूळ आहे. समाज दुभंगला असेल तर तो कधीच टिकू शकत नाही. सामाजिक न्याय हीच सशक्त समाजाची गुरूकिल्ली आहे. त्याद्वारेच देशाची प्रगती साधता येईल. आमच्या सरकारने स्वत:ची ओळख बनविण्यापेक्षा देशाची ओळख बनविण्यावर भर दिला आहे. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हा आमच्या सरकारचा मंत्र आहे.कॉँग्रेसची मोदींच्या विधानावर टीकामोदींच्या पाकव्याप्त बलुचिस्तावर केलेल्या भाष्यामुळे पाकव्याप्त काश्मीरवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पाकव्याप्त काश्मीर हा आपला हक्क आहे. मात्र, त्यामध्ये बलुचिस्तानचा विषय आणून पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा अडचणीत सापडू शकतो. पाकव्याप्त काश्मीरऐवजी बलुचिस्तानचा विषय उपस्थित करण्याचा सल्ला मोदींना कोणी दिला, हे माहीत नाही. आपण हा मुद्दा संवेदनशीलरीत्या हाताळत नसल्याची टीका काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी पंतप्रधान मोदींवर केली.- दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचा वर्षाकाठी १ लाख रुपयांचा आरोग्य खर्च सरकार उचलणार - जीएसटीमुळे समानतेचा नवा पायंडा पडेल. उद्योग आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने देशातील परिस्थितीत आमूलाग्र बदल होतील.- स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्ये ३० टक्के वाढ करण्यात येणार आहे. - एअर इंडिया, बीएसएनलसारख्या सरकारी कंपन्यांना फायद्यात आणले- जागतिक अर्थव्यवस्थेत भारत दहाव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर येईल, असा जागतिक संस्थांचा अहवाल आहे. - विविध सरकारी योजनांचे फायदे देशातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. - जुन्या योजना रखडणे, बारगळणे म्हणजे गुन्हा आहे. जुन्या सरकारच्या योजना मार्गी लावण्यासाठी विशेष व्यवस्थेची उभारणी करण्यात येणार आहे.
हिंसेपुढे झुकणार नाही !
By admin | Updated: August 16, 2016 05:30 IST