ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - इंडियन मुजाहिदीनने 'टार्गेट'ला ठार मारण्यासाठी विषारी पत्रांचा वापर करण्याचा कट रचला होता अशी खळबळजनक माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. विषारी केमिकल्स त्या पत्रावर लावून ते पत्र 'टार्गेट'पर्यंत पोहोचवले जाणार होते असे दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले असून या विषारी पत्रांचा वापर कोणासाठी केला जाणार होते हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.
दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सहा संशयित दहशतवाद्यांविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये हा महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे संशयित दहशतवादी तसहीन अख्तर आणि मोहम्मद वकार अजहर या दोघांनी पोलिस चौकशीत केमिकल्सच्या आधारे विषारी पत्र बनवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. मॅग्नेशियम सल्फेट, एसीटोन आणि कॅस्टर सीड्स या रसायनांचा वापर करुन हे विषारी पत्र बनवण्यात येणार होते. वकारकडून या केमिकल्सचा साठाही जप्त करण्यात आला होता असे आरोपपत्रात म्हटले आहे. या आरोपपत्रात पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या तहसीन अख्तर, जिया उर रहमानन, मोहम्मद वकार अजहर, मोहम्मद मारुफ, मोहम्मद साकेब अन्सारी आणि इम्तियाजला आरोपी केले आहे. दिल्लीतील मीर विहार येथे २०११ साली पोलिसांनी एका कारखान्यावर छापा मारला होता. या कारखान्यात दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी बाँब तयार केले जात होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केला आहे.
पाकिस्तान म्हणजे 'गाव'
दहशतवाद्यांनी इंटरनेट कॉलिंग दरम्यान वापरलेल्या सांकेतिक शब्दांचीही पोलिसांनी उकल केली आहे. मुजाहिदीनतचा सह संस्थापक यासिन भटकळला 'भैय्या', म्होरक्या इक्बाल भटकळला 'बेब' यानावाने संबोधित केले जायचे. तर स्फोटक पदार्थांना 'सीवी' आणि पाकिस्तानला गाव म्हटले जात होते. अल कायदा आणि तालिबानसाठी 'बडे' हा शद्बप्रयोग केला जायचा.