लखनौ : लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून उत्तरप्रदेशात सुपडासाफ झाल्यानंतर आता राज्यातील समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने पक्षांतर्गत सफाई मोहीम हाती घेतली आहे. अपयशामागील कारणे शोधण्यासोबतच कुचकामी ठरलेल्या पक्षाच्या नेत्यांच्या हाती नारळ देण्याचे कामही वेगाने सुरू झाले आहे. या गदारोळात उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीने आपल्या राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेल्या ३६ नेत्यांना बरखास्त केले असून, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मात्र आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास साफ इन्कार केला आहे. राज्यात सपाला फक्त पाच जागा मिळाल्या आहेत. पक्षप्रमुख मुलायमसिंग यादव हे सपाच्या या स्थितीमागील कारणांचे विश्लेषण करीत असल्याचे अखिलेश यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. पक्षातील ज्या नेत्यांना हटविले गेले त्यात प्रामुख्याने नरेंद्र भाटी, सुरेंद्र मोहन अग्रवाल, अनुराधा चौधरी, आशू मलिक, सतीश दीक्षित व मनोज राय यांचा समावेश आहे. याखेरीज अनिस मन्सुरी, मोहंमद अब्बास, इक्बाल अली, हाजी अकरम व कमरुद्दीन हेही आहेत. विद्यार्थ्यांचे माजी नेते राजा चतुर्वेदी व रामसिंग राणा यांनाही बरखास्त केले गेले आहे. सपाच्या कामगिरीकरिता आयोजित बैठकीच्या एक दिवसानंतर या नेत्यांना बरखास्त करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मायावती यांनी बसपाच्या संघटनात्मक आधार मानल्या जाणार्या क्षेत्रीय समन्वयकाच्या भूमिकेबद्दलही नाराजी व्यक्त केली. विभाीय समन्वयकांनी नागरिकांच्या खर्या कौलाची माहिती दिली नसल्याचे मायावतींचे म्हणणे होते. त्यामुळे या समित्यांवरील अनेक संयोजक हटविण्यात आले आहेत. मायावतींनी देशाच्या विविध भागांतून आलेल्या पक्षाच्या पदाधिकारी व नेते यांच्यासोबत स्वत: चर्चा करून पीछेहाटीमागील कारणे जाणून घेतली. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ८० पैकी बसपाला २० जागा मिळाल्या होत्या. मात्र या निवडणुकीत बसपाला आपले खातेही उघडता आले नाही. (वृत्तसंस्था)
यूपीत साफसफाई
By admin | Updated: May 21, 2014 01:54 IST