दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू कळमेश्वर नीमजी परिसरातील घटना
By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST
कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरीजवळ नीमजी परिसरात पाण्याने भरलेल्या खाणीत बुडून नागपुरातील दोन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू कळमेश्वर नीमजी परिसरातील घटना
कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरीजवळ नीमजी परिसरात पाण्याने भरलेल्या खाणीत बुडून नागपुरातील दोन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. अलवीना शश्मी शेख (११) आणि बाबू ऊर्फ शहजाद शम्मी शेख (९) रा. एच.बी. टाऊन शांतिनगर अशी मृत मुलांची नावे आहेत. नीमजी परिसरात काळ्या दगडांची खाण आहे. ती बंद आहे. अवकाळी पावसामुळे या खाणीत पाणी भरून होते. जवळच पंचमुशापीर दर्गा आहे. नागपुरातील शेख कुटुंबीयांनी या दर्गात भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात सहभागी होण्यासाठी ही मुलं कुटुंबीयांसोबत आले होते. मिळालेल्या माहितीनुसार अलवीना व बाबू खेळता-खेळता या खाणीजवळ आले. पाण्यात डोकावून पाहतांना त्यांचे संतुलन बिघडले आणि ते दोघेही पाण्यात पडले. पालकांनी आरडाओरड केली. स्थानिक नागरिकांना याची माहिती होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मुलांना बाहेर काढून कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तातडीने नागपूरच्या दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. नागपुरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. परंतु त्यांनी मेयो रुग्णालयात रेफर केले. तिथे डॉक्टरांनी दोन्ही मुलांना तपासून मृत घोषित केले. पोलीस ठाण्याचा फोन बंद घटनेनंतर नागरिकांनी कळमेश्वर पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु फोन बंद असल्याने संपर्क होत नव्हता. शेवटी काही नागरिकांनी स्वत: जाऊन पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आले तेव्हा मुलांच्या कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.