मजीप्राच्या जलवाहिनीला गळती; रस्त्यावर पाण्याचे डबके
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
खानापूर: पातूर ते खानापूर मार्गावरील मुल्तारामनगरालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीवरील दोन व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून, या पाण्याचे डबके रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे मुल्तारामनगरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मजीप्राच्या जलवाहिनीला गळती; रस्त्यावर पाण्याचे डबके
खानापूर: पातूर ते खानापूर मार्गावरील मुल्तारामनगरालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीवरील दोन व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून, या पाण्याचे डबके रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे मुल्तारामनगरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. खानापूर मार्गावरील नाल्यापासून काही मीटर अंतरावर जैन यांच्या घरासमोर पातूर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीवर असलेल्या दोन व्हॉल्वमधून पाण्याची गळती होत आहे. यामुळे रस्त्यावर घाण पाण्याचे डबके साचले आहे. याचा रस्त्यावरून जाणार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याच्या डबक्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने परिसरातील लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. मुल्तारामनगरातील श्यामराव कवले, वैभव परमाळे, महेश वाडेकर आदींनी मजीप्राच्या पातूर येथील शाखा अभियंत्यांना १ डिसेंबर रोजी जलवाहिनीची गळती बंद करण्याबाबतचे निवेदन सादर केले होते; परंतु त्याची दखल घेतल्या गेली नाही. त्यानंतर १३ डिसेंबर रोजी या लोकांनी त्यांना पुन्हा एक स्मरणपत्र दिले. त्यानंतरही संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. दोन दिवसांपूर्वी या डबक्याच्या ठिकाणी माती टाकण्यात आली; परंतु पाण्यामुळे ही माती वाहून गेली. त्यामुळे संबंधित विभागाने पाण्याची गळती बंद करून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर) 21 सीटीसीएल