नवी दिल्ली : सरकारने दागिन्यांवर उत्पादन शुल्क लावल्याच्या निषेधार्थ सराफा व्यापाऱ्यांनी पुन्हा बंद पुकारला आहे. यापूर्वी व्यापाऱ्यांनी २ मार्चपासून ४२ दिवसांचा बंद पाळला होता. १३ एप्रिल रोजी अस्थायी स्वरूपात हा बंद मागे घेण्यात आला होता. आॅल इंडिया सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र कुमार जैन यांनी सांगितले की, हा बंद १३ एप्रिल रोजी तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आला होता. सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार दागिन्यांवर उत्पादन शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात सरकारने हे स्पष्ट केले आहे की, या व्यापाऱ्यांना अतिरिक्त रेकॉर्ड ठेवावे लागणार नाही; पण हे शुल्क सरकारने मागे घ्यावे या आपल्या मागणीवर सराफा व्यापारी ठाम आहेत. आॅल इंडिया सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र कुमार जैन यांनी सांगितले की, तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याला सोमवारी चांंगला प्रतिसाद मिळाला. प्रमुख शहरात दुकाने बंद होती. दिल्लीत जंतरमंतर येथे व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. राजस्थानात जयपूर, जोधपूर, तसेच कोटासहित अनेक शहरांत सराफा व्यापाऱ्यांची दुकाने बंद होती, तसेच उत्तर प्रदेशात अनेक दुकाने बंद होती, तर आॅल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनने, तसेच आॅल इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनने या बंदपासून स्वत:ला वेगळे ठेवले.जीजेएफचे संचालक अशोक मीनावाला यांनी सांगितले की, आम्ही सरकारसोबत चर्चा करीत आहोत आणि त्याचे सकारात्मक परिणाम मिळत आहेत.
सराफा व्यापाऱ्यांचा तीन दिवस बंद
By admin | Updated: April 26, 2016 05:32 IST