तिघे वाहून गेले
By admin | Updated: August 13, 2015 22:34 IST
तिघे वाहून गेले
तिघे वाहून गेले
तिघे वाहून गेलेचिमुकला, विद्यार्थी आणि शिक्षकाचा समावेशनागपूर : पुरामध्ये तीन जण वाहून गेल्याची घटना मौदा, खापरखेडा आणि उमरेड परिसरात घडली. यामध्ये चिमुकल्यासह एक विद्यार्थी आणि शिक्षकाचा समावेश आहे. यापैकी चिमुकल्यासह विद्यार्थ्याचा मृतदेह मिळाला, मात्र शिक्षकाचा पत्ता लागू शकला नाही. रणवीर घनश्याम धुपारे (१४, रा. कोराड, ता. मौदा) असे मृत विद्यार्थ्याचे, दक्ष विजय सलाम (अडीच वर्षे, रा. नवेगाव साधू ता. उमरेड) असे चिमुकल्याचे तर कृष्णा जंगलू चापके (४५, रा. मोहपा, ता. कळमेश्वर) असे वाहून गेलेल्या शिक्षकाचे नाव आहे. रणवीर हा शाळेत सायकलने जात होता. दरम्यान, तारसा नजीकच्या सांड नदीला आलेल्या पुरामुळे पूल पाण्याखाली गेला. पुलावरून पाणी वाहत असताना त्याने सायकल नेण्याचा प्रयत्न केला. त्यात तो वाहून गेला. काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळला. शिक्षक कृष्णा चापके हे त्यांचा मित्र राहुल रामकृष्ण मोहकर (३५) यांच्यासह मोहपा येथून एमएच-४०/२०४० क्रमांकाच्या मोटरसायकलने शाळेत जाण्यासाठी निघाले. वाटेत लोणखैरी पुलावरून पाणी असल्याने कृष्णा मोटरसायकलहून उतरले आणि ते दोघेही मोटरसायकल हातात घेऊन पायी चालू लागले. त्यांचा मित्र पुढे होता. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहाने ते मोटरसायकलसह वाहून गेले. ते सायंकाळपर्यंत कुठेही आढळून आले नाही. याबाबत खापरखेडा पोलिसांनी हरविल्याची नोंद केली असून तपासकार्य सुरू आहे. कृष्णा हे महादुला येथील स्मिता पाटील विद्यालयात तर कोराडी येथील पंजाबराव धोटे महाविद्यालयात त्यांचा मित्र राहुल अध्यापक आहे. उमरेड तालुक्यातील नवेगाव साधू येथे गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अडीच वर्षांचा दक्ष विजय सलाम हा वाहून गेला. त्याच्या घरामागे एक नाला असून सकाळी ८ वाजताच्या सुमारास दक्ष आणि त्याचा मोठा भाऊ विपुल (५) दोघेही नाल्याच्या काठावर उभे होते. अशातच दक्षचा तोल गेला आणि तो नाल्यात पडला. लागलीच विपुलने आईला याबाबत सांगितले. आरडाओरड सुरू झाली. गावातील सुमारे २० ते २५ नागरिकांनी परिसर पिंजून काढला. बरीच शोधाशोध केल्यानंतर सकाळी ११ वाजता दक्षचा मृतदेह एका झुडपात आढळून आला.