ऑनलाइन टीम
श्रीनगर, दि. २८ - ३७० कलम हे रद्द करणं बाजुला राहिलं ते पंतप्रधानांनी भक्कम करायला हवं असं पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितलं. या कलमाला हात लावता येणार नाही, या आधी असे प्रयत्न झाले होते, हे भाजपासकट सगळ्यांना माहित असल्याचं मुफ्ती म्हणाल्या. निवडणुकांमध्ये धर्माच्या आधारे ध्रुवीकरण करण्यात आल्याचे सांगताना हाच प्रयत्न पुन्हा सुरू असल्याचा आरोप करत काश्मिरची पुन्हा फाळणी होण्याची भीती मुफ्ती यांनी व्यक्त केली.
ओमर अब्दुल्ला यांच्याप्रमाणेच मुफ्ती यांनीही ३७० कलम हे जम्मू व काश्मिरला भारताशी जोडणारे कलम असल्याचे सांगत, पंतप्रधानांनी काश्मिरच्या जनतेची मने जिंकायला हवीत असे सांगितले. या कलमावर चर्चा होऊ शकत नाही आणि करायचीच असेल तर या राज्याच्या लोकांना काय वाटतं हे वाचारावं लागेल असं त्या म्हणाल्या.
जर तुम्हाला काश्मिरबाबत चर्चा करायची असेल तर ३७० या कलमाची नाही तर राज्याला होत असलेल्या तोट्यांची चर्चा करा असे सांगताना ऊर्जा, पाणी व राज्यपालांचा प्रलंबित प्रश्न यांची चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली.