ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १३ - काश्मिर प्रश्नाचा समावेश नसेल तर भारत - पाक बोलणी होणार नाहीत असं सांगत पाकिस्तानने गेल्या काही दिवसांत भारत पाक संबंध सुधारत असल्याच्या चर्चेच्या फुग्याला टाचणी लावली आहे. सईद हाफीजच्या व्हॉइस सँपल्सच्या मुद्यावरूनही पाकिस्तानने घुमजाव केले असून २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यासंदर्भात आणखी पुरावे हवे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवाझ शरीफ यांच्या हस्तांदोलनातून गरज नसताना मोठ्या आशा निर्माण केल्या गेल्याचे दिसत आहे.
पुढील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला भेट देणार असून सार्क परीषदेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी भारतीय व पाकिस्तानी अधिकारी चर्चेची बोलणी सुरू करतिल असेही जाहीर करण्यात आले. त्याखेरीज मुंबईवरील हल्ल्याचा तपास पाकिस्तानच्या न्यायालयात गतीने करण्यात येईल असेही सांगण्यात आले. मात्र, सोमवारी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार असलेले सरताझ अजिझ यांनी काश्मिर प्रश्न नसेल तर भारत - पाक बोलणी होणार नाहीत असे स्पष्ट केले आणि ही सगळी चर्चा निष्फळ होती की काय अशी शंका निर्माण केली आहे.