यदु जोशी / गजानन जानभोर , नवी दिल्ली - एका खात्याचे एक कॅबिनेट मंत्री आणि एक किंवा दोन राज्यमंत्री अशी केंद्रातील प्रत्येक विभागाची रचना असते. पण या वेळी नरेंद्र मोदी सरकारमध्ये एक कॅबिनेट मंत्री आणि त्यांच्या दिमतीला पाच किंवा सहा राज्यमंत्री अशी रचना राहू शकते. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, पायाभूत सुविधा, उद्योग, वाहतूक, कृषी आदी क्षेत्रांशी संबंधित वेगवेगळे विभाग एकत्र करायचे आणि त्याचे कॅबिनेट मंत्रिपद एकाला देऊन त्यांच्यासोबत पाच ते सहा राज्यमंत्री द्यायचे, असे सूत्र निश्चित केले जाऊ शकते. एकाच क्षेत्राशी संबंधित वेगवेगळे विभाग असले की समन्वयाचा अभाव दिसतो आणि निर्णय लवकर होत नाहीत, हा अनुभव लक्षात घेता विभागांचे एकत्रीकरण करण्याचा विचार मोदी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अरुण जेटली यांची कोअर कमिटी करीत आहे. या नव्या रचनेमुळे कॅबिनेट मंत्र्यांची संख्या कमी होईल, असे मानले जाते. तसेच राज्यमंत्र्यांची संख्या वाढू शकते. भाजपा आणि मित्रपक्षांच्या सदस्यांची मोठी संख्या लक्षात घेता मंत्रिमंडळाची रचना करताना कसरत होणार आहे. अनेक दिग्गजांना सामावून घेण्याचे आव्हान आहे. अशावेळी मंत्र्यांची संख्या कमी करणे परवडणारे नसेल. या पार्श्वभूमीवर काही नवीन विभाग निर्माण केले जाऊ शकतात. त्याद्वारे मंत्रिमंडळातील सदस्य संख्येचे संतुलन साधले जाईल. पण राज्यमंत्र्यांच्या अधिकाराचा संकोच होणार नाही व त्यात स्पष्टता राहील याची काळजी घ्यावी लागेल. भाजपाला संघाचा ‘सल्ला’! नरेंद्र मोदी सरकार स्थापनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कुठलीही भूमिका नसणार, असे भाजपा वारंवार सांगत असली तरी भाजपा आणि पर्यायाने मोदींना ‘सल्ला’ देण्यासाठी संघ कमालीचा उत्सुक असल्याचे चित्र आहे़ गरज पडल्यास आम्ही सरकार स्थापनेसाठी सल्ला देऊ शकतो, असे संघाने म्हटले आहे़ अर्थात भाजपा मंत्रिमंडळ वा पक्षाच्या कामकाजात आमची कुठलीही ढवळाढवळ राहणार नाही़ आम्ही ‘रिमोट कंट्रोल’च्या कुठल्याही भूमिकेत नसणार, असेही संघाने स्पष्ट केले आहे़ आम्ही कुठल्याही प्रकारे ‘रिमोट कंट्रोल’ची भूमिका साकारणार नाही़ पण गरज भासल्यास आम्ही सल्ला देऊ शकू, असे संघ प्रवक्ते राम माधव यांनी जयपूर येथे बोलताना स्पष्ट केले़ लोकसभा निवडणुकीत जनतेला देशाच्या स्थितीबाबत जागृत करणे, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करणे, या जबाबदार्या आम्ही पार पाडल्या़ आमचे हे कार्य पूर्ण झाले़ आता आम्ही पुन्हा चरित्र निर्माण, व्यक्तिविकास आणि देशसेवा या आमच्या संघटनेच्या मूळ कार्याकडे वळू़ दैनंदिन राजकारण, सरकार गठन, मंत्रिमंडळ गठन यात आमचा कुठलाही हस्तक्षेप राहणार नाही़, असे संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी सांगितले. मी येथे वरिष्ठांची भेट घेण्यास आलो आहे. संघ मंत्रिमंडळ स्थापण्यासारख्या बाबींमध्ये लक्ष घालत नाही, असे नायडू म्हणाले. केशवकुंज येथे अमित शहा शनिवारी जवळपास दोन तास होते.
एका कॅबिनेटमागे सहा राज्यमंत्री
By admin | Updated: May 19, 2014 02:46 IST