ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. १३ - मध्यप्रदेशमधील गाडरवाडा गावात आता कोणीही उघड्यावर शौचास जाण्याची हिंमत करत नाही.... गावातील सरकारी यंत्रणेने ग्रामस्थांच्या मदतीने एका पथकाची स्थापना केली असून हे पथक उघड्यावर शौचाला जणा-यांना बघून जोरजोरात शिट्टी वाजवतात. त्यामुळे समोरचा व्यक्ती कंटाळून उघड्यावर शौचावर जाणे बंद करतो.
स्वच्छ भारत अभियान गावागावात पोहोचवण्यासाठी मध्य प्रदेशमधील सरकारी यंत्रणांनी कंबर कसली असून जिल्हाधिकारी महेशचंद्र चौधरी यांनी स्वच्छतेसाठी नवीन शक्कल लढवली. त्यांनी गाडरवाडा गावातील ग्रामस्थांसोबत चर्चा करुन गावातील घराघरात शौचालय बांधण्यावर भर दिला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले व गावातील घराघरात शौचालय बांधण्यात आले. मात्र यानंतरही उघड्यावर शौचासाठी जाण्याची पद्धत बंद पडणार नव्हती. यावर लगाम लावण्यासाठी चौघरी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने एक बाल पथक तयार केले. हे पथक उघड्यावर शौचाला जाणारा किंवा बसलेला व्यक्ती दिसला की जोरजोरात शिट्टी वाजवून त्याच्या नाकी नऊ आणतात. हे पथक गावातील अन्य लोकांना उघड्यावर शौचास गेल्याने होणारे दुष्परिणामही समजावून सांगतात. आता या गावात जलयोजनाही राबवण्यात येत असून या गावातील विकासयात्रा बघून अन्य गावातील ग्रामस्थही आता स्वच्छता अभियानासाठी पुढाकार घेत आहेत.