ऑनलाइन लोकमत
रांची, दि. १ - साईबाबांनी स्वत:ला कधीच देव मानले नव्हते आणि त्यांच्याविषयी गैरसमज पसरवून समाजाची दिशाभूल करु नये असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मांडले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून साईबाबांवरुन वाद सुरु असून ते देव नाहीत असे वादग्रस्त मत शंकराचार्यांनी मांडले होते. या पार्श्वभूमीवर रांची येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भैय्याजी जोशी यांनी त्यांचे मत मांडले आहे. देशात लोकांनी महापुरुषांची प्रतिमा स्थापन करण्याची परंपराच सुरु आहे. शंकराचार्यांचे वैयक्तिक मत असून शकते पण अशा अनावश्यक गोष्टींवर वादापासून लांब राहायला हवे असे जोशी यांनी म्हटले आहे. साईबाबांविषयी भैय्याजी जोशी यांनी मांडलेल्या मतावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, संघाविरोधात काही मंडळींनी षडयंत्रण रचले असून संघाला आरोपीच्या पिंज-यात उभे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र हा हिंदूंचा अपमान आहे असेही त्यांनी नमूद केले.