गोलाणी मार्केट प्रकरणात नव्याने फिर्याद दाखल करावी मागणी: सुनील माळी यांचे मनपा आयुक्तांना निवेदन
By admin | Updated: August 2, 2016 23:09 IST
जळगाव: तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी गोलाणी मार्केट व मनपाच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीच्या बांधकामातील अनियमिततेप्रकरणी व गैरव्यवहारप्रकरणी दिलेली तक्रार शहर पोलिसांनी विशेष लेखापरीक्षण अहवाल न मिळाल्याचे कारण देत निकाली काढली आहे. आता हा अहवाल प्राप्त झालेला असल्याने आयुक्त जीवन सोनवणे यांनी याप्रकरणी नव्याने फिर्याद देण्याची मागणी भाजपाचे मनपातील गटनेते सुनील माळी यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गोलाणी मार्केट प्रकरणात नव्याने फिर्याद दाखल करावी मागणी: सुनील माळी यांचे मनपा आयुक्तांना निवेदन
जळगाव: तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी गोलाणी मार्केट व मनपाच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीच्या बांधकामातील अनियमिततेप्रकरणी व गैरव्यवहारप्रकरणी दिलेली तक्रार शहर पोलिसांनी विशेष लेखापरीक्षण अहवाल न मिळाल्याचे कारण देत निकाली काढली आहे. आता हा अहवाल प्राप्त झालेला असल्याने आयुक्त जीवन सोनवणे यांनी याप्रकरणी नव्याने फिर्याद देण्याची मागणी भाजपाचे मनपातील गटनेते सुनील माळी यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या लेखा परीक्षण अहवालात २३ गंभीर स्वरूपाचे आक्षेप नोंदविले आहेत. मक्तेदाराने स्वखर्चाने संपूर्ण बांधकाम करावयाचे असतानाही तत्कालीन नगरपालिकेने ठराव करून विकासकाला १२ कोटी ७६ लाख रुपये दिल्याचा निष्कर्ष लेखा परीक्षण अहवालात काढण्यात आला आहे. सकृतदर्शनी या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचे दिसत असून अनेक अनियमितता ठळक जाणवून येत आहेत. तत्कालीन आयुक्त कापडणीस यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिलेली होती. मात्र तक्रारीसोबत लेखा परीक्षण अहवाल नसल्याने पोलिसांनी कोणताही गुन्हा न नोंदविता ही तक्रार निकाली काढली. मात्र आता लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झालेला असल्याने आयुक्तांनी नव्याने तक्रार देऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माळी यांनी केली आहे.