नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाची प्रचार मोहीम हाताळणारी जपानची कम्युनिकेशन एजन्सी देनत्सूला दूषणे देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने सुमारे ६०० कोटी रुपये मोजून या संस्थेची सेवा घेतली होती. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सामान्य माणसाच्या भल्यासाठी काम करणारा तरुण आणि तडफदार नेता म्हणून पुढे आणायचे होते. परंतु भाजपाच्या जाहिरातीच्या झगमगाटापुढे काँग्रेस फिके ठरले. त्यामुळे देनत्सू पराभवाची जबाबदारी नाकारू शकत नाही. या एजन्सीने सृजनशीलतेसाठीच नव्हे, तर जाहिरातीच्या प्रसिद्धीसाठी विविध मीडिया हाऊसपेक्षा अधिक शुल्क आकारले होते, असा आरोप काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने केला. देनत्सूच्या भारतातील प्रवक्त्याने हे आरोप फेटाळले आहेत. मोहिमेला प्रारंभ करण्यापूर्वी झालेला करार आणि त्याची प्रक्रिया पारदर्शक होती. जाहिरातीसाठी आपल्या एजन्सी व्यतिरिक्त काँग्रेसने आणखी एका एजन्सीची सेवा घेतली होती. आकारण्यात आलेले दर त्रिकोणीय होते. यामध्ये लाईन्ट, एजन्सी आणि मीडिया हाऊस/ थर्ड पार्टी प्रोव्हायडर यांचा सहभाग होता, असेही त्या प्रवक्त्याने म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
काँग्रेसच्या पराभवाचे खापर जपानी जाहिरात संस्थेवर
By admin | Updated: May 21, 2014 01:55 IST