लोकमत ऑनलाइन
नवी दिल्ली, दि. ६ - प्रसारमाध्यमांमध्ये अत्यंत संवेदनशील माहिती फुटत असल्याच्या घटनेची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली असून केंद्रीय गृहखात्याने प्रसारमाध्यमांशी बोलण्याची परवानगी नसलेल्या अधिका-यांना तसा संबंध ठेवण्यास बंदी घातली आहे. गृहखात्याने २७ ऑगस्ट रोजी संबंधित आदेश काढला आहे. राजनाथ सिंह यांच्या मुलाच्या कथित गैरव्यवहाराविषयी बातम्यांना पाय फुटल्याच्या सुमारास हा आदेश काढण्यात आला आहे.
केंद्र सरकारशी संबधित असलेली संवेदनशील माहिती प्रसारमाध्यमांमध्ये झळकत दिसत असल्याचे लक्षात आल्याचे गृहखात्याच्या संचालक श्यामलाल मोहन यांनी सांगितलं आणि त्याचदिवशी वरील सूचना केल्याचं त्या म्हणाल्या. याआधीही अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु प्रथमच लेखी स्वरुपात असे निर्देश देण्यात आले आहेत. कार्यालयीन संकेतांचा संदर्भ देत सरकारी अधिकारी शासकीय संकेतांचे व नियमांचे पालन करावे आणि संवेदनशील माहिती प्रसारमाध्यमांना देऊ नये, तसेच ज्या अधिका-यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे अभिप्रेत आहे त्यांनीच बोलावे असा आदेश काढण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या गृहखात्यासंदर्भात केवळ गृहसचिव यांनाच प्रसारमाध्यमांशी बोलण्याची सहमती असून अन्य अधिका-यांनी असा संवाद टाळावा असा पोलादी पडदा आता गृहमंत्रालयाने उभा केला आहे.