श्रीगोंदा : लोकसभा निवडणुकीतील जय पराजयाचा सारीपाट डोळ्यासमोर ठेवत श्रीगोंद्यातील दिग्गज नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नमो नमो फॅक्टरमुळे भाजपाच्या तिकिटाचा निर्देशांक चांगलाच वाढणार आहे. राष्टÑवादीचे काँग्रेसचे नेते काय भूमिका घेतात यावर चर्चा सुरू झाली आहे. राष्टÑवादीकडून आ. बबनराव पाचपुते यांना उमेदवारी निश्चित मानली जाते. मात्र राकाँचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार हे तिकिटावर दावा करणार आहेत. अशा परिस्थितीत पवार काका-पुतण्या काय खेळी करतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेस नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत एकास एक उमेदवार देऊन २०१४ मिशन राबविण्यासाठी व्यूहरचना आखली होती. लोकसभा निवडणुकीपासून कुकडीचे अध्यक्ष राहुल जगताप व बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी भाजपाचे तिकीट मिळण्यासाठी छुपे प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच भाजपाच्या सुवर्णा पाचपुते, राजेंद्र म्हस्के व संतोष लगड यांनी भाजपाच्या तिकिटावर पहिला हक्क अशी भूमिका घेतली आहे. संगमनेर व श्रीगोंदा मतदारसंघ जागा वाटप करताना बदल करावा, श्रीगोंद्यातून सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.शशिकांत गाडे यांनी तिकिटासाठी धनुष्यबाण काढले आहे. महाआघाडीत तिकिटाचा महासंग्राम चांगलाच रंगणार आहे. २००९ मध्ये श्रीगोंदा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी कमळ फुलविण्याचा प्रयत्न केला, अपयश येताच पुन्हा स्वगृही परतले. नागवडेंना मानणारा मोठा गट असल्याने काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन नागवडे मतदारांसमोर तिसरा पर्याय उभा करणार असल्याची चर्चा आहे. सध्या राजकीय आखाड्यात नमो-नमोची लहर आहे. मात्र श्रीगोंद्यातील मतदार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेहमीच विरोधी भूमिका घेतात हा इतिहास आहे. त्यामुळे भाजपाची उमेदवारी म्हणजे सर्व काही अलबेल अशी परिस्थिती राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत आ.पाचपुतेंच्या विरोधात सर्व विरोधक एका झेंड्याखाली एकत्र आले तर धमासान लढाई अटळ आहे. विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित असे वेगळे चित्र पुढे येण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)
भाजपाच्या तिकिटासाठी रस्सीखेच
By admin | Updated: May 21, 2014 23:59 IST