नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येबद्दल जन्मठेप भोगत असलेल्या ए. जी. पेरारीवेलनच्या कबुलीजबाबातून, त्याचा गुन्ह्याशी संबंध नसल्याचे दर्शविणारा भाग आपण वगळला होता, असे केंद्रीय गुप्तचर सीबीआयच्या संबंधित अधिका-याने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.तामिळनाडूतील श्रीपेराम्बदूरमधील १९९१च्या प्रचारसभेत पुष्पहारात दडविलेल्या बॉम्बचा स्फोट घडवून राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. तो बॉम्ब बनविण्यासाठी वापरलेल्या नऊ व्होल्टच्या दोन बॅट-या मारेक-यांना पुरविल्याच्या आरोपावरून पेरारीवेलन यास अटक होऊन शिक्षा झाली. अटक केली तेव्हा तो १९ वर्षांचा होता. या घटनेला २६ वर्षे उलटून गेल्यानंतर त्याचा कबुलीजबाब नोंदविणारे स्व्ही. त्यागराजन यांनी आता वरील प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.ते म्हणतात की, पेरारीवेलनने त्या दोन बॅटºया पुरविल्याचे सांगितले होते. मात्र त्या बॅटºया कोण आणि कशासाठी वापरणार आहेत, याची पूर्वकल्पना असल्याचा त्याने इन्कार केला होता. त्याचे म्हणणे खरे होते, याला पुढील तपासातून दुजोरा मिळाला. कारण या हत्या कटाचा सूत्रधार शिवरासन याने ‘एलटीटीई’चा श्रीलंकेतील म्होरक्या पोट्टु अम्मान याला मे १९९१मध्ये जो वायरलेस संदेश पाठविला, त्यात या हत्या कटाची माहिती आपण, शुभा व धनु या तिघांखेरीज अन्य कोणालाही नाही, याची खात्री दिली होती. धनु ही आत्मघाती हल्लेखोर होती व तिनेच राजीव गांधींना सभेच्या वेळी हार घालताना त्यातील बॉम्बचा स्फोट घडवून आणला होता.त्यागराजन म्हणतात की, पेरारीवेलनच्या कबुलीजबाबातील कटामध्ये त्याचा सहभाग नसल्याचे दर्शविणारा भाग आपण वगळला, कारण बॉम्ब नेमका कोणी व कसा बनविला याचा तपास त्या वेळी अपूर्ण होता. तो आजही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे कबुलीजबाबात तो भाग ठेवला असता तर तो कबुलीजबाब राहिलाच नसता.त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने पेरारीवेलनची फाशी रद्द करून त्याच्यावर दया केली आहेच. आता हे प्रतिज्ञापत्र लक्षात घेऊन त्याला राहिलेली शिक्षा माफ करून सोडून देणे न्यायाचे होईल. न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे त्यागराजन यांचे प्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर न्यायालयाने पेरारीवेलनच्या शिक्षामाफीवर केंद्र सरकारला दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्यास सांगितले.२१ वर्षे एकांतवासात-इतर आरोपींसह पेरारीवेलनलाही फाशीची शिक्षा झाली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २०१४मध्ये ती रद्द करून त्याला जन्मठेप दिली. गेली २३ वर्षे तो एकांतवासात आहे. त्याला १९९१नंतर गेल्या आॅगस्टमध्ये प्रथमच पॅरोलवर सोडण्यात आले.तामिळनाडू सरकारने या खटल्यातील जन्मठेप भोगत असलेल्या पेरारीवेलनसह इतर आरोपींची उर्वरित शिक्षा माफ करून त्यांना सोडून देण्याचा निर्णय घेतला. मात्र केंद्र सरकारने त्याविरुद्ध याचिका केल्याने हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे.
राजीव गांधींच्या खुन्याच्याजबाबात बदल केला, महत्त्वाचा भाग वगळला; सीबीआय अधिका-याचे प्रतिज्ञापत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:13 IST