ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - अन्यायाविरोधात महिलांनी एकटे न लढता एकत्र येऊन लढा द्यावा. आगामी काळात याच महिला काँग्रेसची देशभरात त्सुनामी येईल असे विधान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधींनी या विधानातून प्रियंका गांधींच्या राजकीय प्रवेशाचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दिल्लीत हमारा संकल्प या काँग्रेसच्या महिला शाखेच्या कार्यक्रमात बुधवारी राहुल गांधी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 'आता विचारधारेच्या लढाईला सुरुवात झाली असून महिलांनी राजकारणात यावे. मात्र यासाठी त्यांनी एकटे न लढता काँग्रेसच्या माध्यमातून लढा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. 'घरात महिलांना आई, बहिण या नावाने हाक मारणारी लोकं बाहेर गेल्यावर महिलांना छेडतात. कायद्यांमध्ये सुधारणा करुन चालणार नसून लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. 'विद्यमान सरकार महिलेला देवीचा दर्जा देते. पण त्या देवीमध्ये शक्ती असावी असे त्यांना वाटत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.