रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित बीजापूर जिल्ह्णातून सोमवारी अपहरण करण्यात आलेल्या चार पोलीस जवानांचे बुधवारी अखेर गोळ्यांनी चाळणी झालेल्या अवस्थेतील मृतदेहच आढळून आले. नक्षल्यांनी या चारही जवानांची क्रूर हत्या करून त्यांचे मृतदेह रस्त्यांवर फेकून दिले होते. मृतदेहांजवळ नक्षल्यांची काही पत्रके आढळली आहेत. पोलिसांकडून गरीब व उपेक्षित आदिवासींचा छळ होत असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. या दरम्यान अन्य दोन अपहृत जवान अद्यापही नक्षल्यांच्या तावडीत असून त्यांचा शोध सुरूआहे.बीजापूर जिल्ह्णाचे पोलीस अधीक्षक के.एल. धु्रव यांनी ही माहिती दिली. जिल्ह्णाच्या कुटरू ठाण्याअंतर्गत गुदमा गावानजीकच्या रस्त्यावर या चारही पोलीस जवानांचे मृतदेह सापडले. सहायक आरक्षक राजूराम केलम, मंगल सोढी, जयदेव यादव आणि रामा भज्जी अशी मृत्युमुखी पडलेल्या जवानांची नावे आहेत. गत सोमवारी बीजापूरवरून कुटरूला परतत असताना कुटरू-सकनापल्लीदरम्यान नक्षल्यांनी या पोलिसांची बस रोखत तिची झडती घेतली होती. यानंतर बसमधील चार पोलिसांना खाली उतरवून नक्षली आपल्यासोबत घेऊन गेले होते. धु्रव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पोलीस जवान काही खासगी कामासाठी बीजापूरला गेले होते व तेथून कुटरूकडे परत निघाले होते. यावेळी ते पोशाखात नव्हते. यापाठोपाठ दोन अन्य पोलीस जवान मोटरसायकलवरून कुटरूकडे येत असताना नक्षल्यांनी त्यांचेही अपहरण केले होते. मिच्चा हुंगा आणि जयलाल अशी या दोघांची नावे आहेत. त्यांचा अद्यापही शोध सुरू आहे. हे सर्व जवान अधिकाऱ्यांना माहिती न देता गेले होते शिवाय त्यांनी पुरेशी सुरक्षाही घेतली नव्हती, असा दावाही अतिरिक्त पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण एलेसेला यांनी केला.
पोलिसांची नक्षल्यांकडून हत्या
By admin | Updated: July 16, 2015 03:51 IST