ऑनलाइन टीम
भुवनेश्वर, दि. १४ - भाजपा प्रणित एनडीए बहुमताच्या जवळ जाणार हे निश्चित झाले असताना बिजू जनता दल व जयललिता यांचा एआयडीमेके हे पक्षही एनडीएमध्ये सामील होण्याचे संकेत मिळाले आहेत. तसे झाले तर एनडीएला सरकार स्थापन करण्यात कोणतीही अडचण येणार नाही असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. बीजेडीला या निवडणुकीत १५ जागा तर जयललितांच्या एआयडीएमकेला २५ जागा मिळण्याची शक्यता एग्झिट पोल्समध्ये व्यक्त झाली आहे. त्यामुळे रालोआला किमान अंदाजित असलेल्या २५० जागा जिंकता आल्या तरी बीजेडी व एआयएडीमेकेच्या एकूण ४० जागांच्या आधारे २७२चा पल्ला आरामात पार पाडता येणार आहे.
बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक यांनी आपला पक्ष काँग्रेस व भाजपा या दोघांशीही समान अंतर राखून असल्याचे सांगितले. याआधी नरेंदर मोदी हे पंतप्रधान बनण्यायोग्य नसल्याचे विधान पटनाईक यांनी केले होते, त्याचप्रमाणे तिस-या आघाडीची चाचपणीही पटनाईक यांनी केली होती. परंतु आता मात्र बीजेडीतील एका ज्येष्ठ नेत्याने ओडिशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी असल्याचे सांगितले. तसेच नवीन सरकारला विशिष्ट अटीवर पाठिंबा दर्शवण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सुचित केले. त्यामुळे ओडिशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याची माणी मान्य केली तर भाजपा प्रणित रालोआला बीजेडी पाठिंबा देऊ शकते असे दिसत आहे.
दरम्यान, जयललिता व नरेंद्र मोदी यांचे परस्पर संबंध अत्यंत चांगले असून एआयडीएमके हा पक्ष रालोआला पाठिंबा देऊ शकतो असे त्यांनी सुचित केले. मोदी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली त्यावेळी जयललिता उपस्थित होत्या. याशिवायही या दोघांमध्ये चांगले संबंध असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. त्यामुळे मजबूत स्थितीत असलेल्या रालोआला एआयडीएमके पाठिंबा देऊ शकतो अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जर बीजेडी व एआयडीएमके रालोआमध्ये सामील झाले तर २७२ चा आकडा आरामात पार होईल असा कयास असून, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होईल असे स्पष्ट दिसत आहे.