ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या (FTII)अध्यक्षपदी झालेल्या गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीचे प्रकरण चिघळले असून पल्लवी जोशीनेही सद्यस्थितीत FTII मध्ये काम करणे शक्य नसल्याचे सांगत सोसायटीचा राजीनामा दिला आहे. माहिती व प्रसारण खात्याला पल्लवीने पत्र लिहिले असून गेले २५ दिवस संपावर गेलेल्या विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. नकारात्मक वातावरणामध्ये सर्जनशीलतेला वाव मिळत नसल्याचेही पल्लवीने नमूद केले आहे. जोपर्यंत सरकार व विद्यार्थी यांच्यामधील वाद समजूतदारपणे सोडवला जात नाही तोपर्यंत राजीनामा स्वीकारला जावा असे तिने म्हटले आहे.
जुलैच्या ३ तारखेला विद्यार्थी व माहिती व प्रसारण मंत्री अरूण जेटली यांच्यात चर्चा झाली परंतु हा प्रश्न काही सुटला नाही. FTII सोसायटीची पुनर्रचना व्हावी तसेच नियुक्त्यांबाबत पारदर्शकता असावी या मागण्यांना सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. सरकार विद्यार्थ्यांची बाजू ऐकत नसल्यामुळे मी समाधानी नसल्याचे पल्लवीने म्हटले आहे.
याआधी जानू बारूआ व संतोष सिवन यांनीही गव्हर्निंग कौउन्सिलच्या पदांचा तीन आठवड्यांपूर्वी राजीनामा दिला असून पल्लवीची भर पडली आहे.
हा प्रश्न केवळ चौहान यांच्या नियुक्तीचा नाही तर फिल्म इंडस्ट्रीच्या भविष्याचा असल्याचे पल्लवीचे म्हणणे आहे.