नवी दिल्ली : अमृतसरला आयसी-९१४ हे विमान थांबले तेव्हा यंत्रणेत उडालेल्या गोंधळामुळे पोलिसांना कोणत्याही स्पष्ट सूचना देण्यात आल्या नव्हत्या. त्या परिस्थितीत सदर विमान अपहरणकर्त्यांना अफगाणिस्तानातील कंदहारला नेता आले, त्याची परिणती नंतर तीन कुख्यात अतिरेक्यांना सोडण्यात झाली, असा खुलासा रॉ चे माजी प्रमुख ए.एस. दुलत यांनी केला आहे.२४ डिसेंबर १९९९ रोजी या विमानाचे अपहरण झाले तेव्हा आपत्ती व्यवस्थापन गट (सीएमजी) गोंधळून गेला होता. कुणीही निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. याच संभ्रमाच्या स्थितीमुळे पंजाब पोलिसांना कोणत्याही सूचना देण्यात आल्या नव्हत्या. हा गट वाद घालत बसला असतानाच अपहरणकर्त्यांनी ते अमृतसरहून कंदहारकडे वळविले. दुलत हे त्यावेळी या गटाचे सदस्य होते. नुकताच त्यांनी करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत त्याबाबत खुलासा केला. या विमानात १५५ प्रवासी आणि विमान कर्मचारी होते. त्यांच्या बदल्यात अपहरणकर्ऱ्यांनी तीन अतिरेक्यांना सोडण्याची मागणी केली होती. यापैकी मुश्ताक लतराम आणि मौलाना मसूद अझहर हे दोन अतिरेकी जम्मू-काश्मीरच्या कारागृहात होते. जम्मू-काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यासोबत चर्चेची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. केंद्र सरकारने चूक केल्याचा आरोप अब्दुल्ला यांनी संतप्त होत केला होता. त्याच आवेशात ते तत्कालीन राज्यपाल गिरीशचंद्र सक्सेना यांच्याकडे राजीनामा देण्यासाठी गेले होते. सक्सेना यांनी त्यांना शांत केले. त्यानंतर अब्दुल्ला यांनी दोन अतिरेकी सोडण्याची तयारी दर्शविली होती, अशी माहिती दुलत यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)ब्रजेश मिश्राच सरकार चालवायचे आग्रा शिखर परिषदेच्या आधीच्या रात्री पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ आणि तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्यातील बैठक वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरली. अडवाणींनी दाऊद इब्राहीमला सोपविण्याची मागणी करीत मुशर्रफ यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर मुशर्रफ यांनी पाऊल मागे घेतल्याचा परिणाम आग्रा शिखर परिषद अपयशी ठरण्यात झाली. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांनी ‘यार होते होते रह गया, हो गया था वो तो’ असे उद्गार काढले होते. मिश्रा हेच त्यावेळी सरकार चालवीत होते. ते अडवाणींपेक्षा सशक्त बनले होते. अडवाणी आणि मिश्रा यांच्यात तणाव निर्माण होण्याचे कारणही तेच होते. वाजपेयींनी अधिकारांची व्यवस्था करताना मिश्रांना अडवाणींपेक्षा शक्तिशाली बनविले होते, असा दावाही दुलत यांनी केला. वाजपेयी म्हणाले होते, गुजरात दंगल ही चूकच२००२ मधील गुजरातच्या दंगली ही चूक होती, असे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी नेहमीच म्हणायचे. मी त्यांची अखेरची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हेच उद्गार काढले होते, याचे स्मरणही दुलत यांनी करवून दिले. दुलत हे २००० पर्यंत रॉचे प्रमुख राहिल्यानंतर त्यांची वाजपेयींच्या कार्यालयात काश्मीर मुद्यावर विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती.भाजपने दुलत यांचे आरोप फेटाळलेभाजपचे प्रवक्ते एम.जे. अकबर यांनी दुलत यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. इंडियन एअरलाईन्सच्या विमानातील प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी सरकारला ते पाऊल उचलले भाग पडले, असे ते म्हणाले. कंदहार विमान अपहरण प्रकरणाच्यावेळी वाजपेयी यांचे सरकार दिशाहीन होते. सरकारकडे राजनैतिक इच्छेचा अभाव दिसून आला. त्यामुळे सरकारवर अतिरेक्यांची मुक्तता करण्याची नाचक्की ओढवली, असे काँग्रेसचे अन्य प्रवक्ते टॉम वडक्कन यांनी म्हटले. कंदहार विमान अपहरणाला अनेक वर्षे झाली असली तरी दुलत यांच्या दाव्यामुळे नवा वाद छेडला गेला आहे. सरकार आधीच ललित मोदी कांडात फसले असताना संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याने काँग्रसेला आणखी एक मुद्दा मिळाला आहे.मोदींनी माफी मागावी- काँग्रेसरॉचे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांनी केलेला दावा पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००२ च्या गुजरात दंगलींबद्दल माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. त्यावेळी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. दुलत यांनी १९९९ मधील विमानाच्या अपहरणप्रकरणी यंत्रणेतील गोंधळ समोर आणला असून भाजपने नेहमीच राष्ट्रीयत्वाचा मुखवटा पांघरत दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी तडजोड केली आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते अजयकुमार यांनी म्हटले. भारतरत्न वाजपेयी यांनी २००२ मधील गुजरात दंगली देशासाठी लाजिरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया देत मोदींना राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता. मोदी त्यांच्या शब्दांचा आदर करीत देशाची माफी मागणार काय? असा सवालही त्यांनी केला.
कंदहार विमान अपहरणावरून नवा वाद
By admin | Updated: July 4, 2015 02:25 IST