ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. १५ - छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागातून अपहरण करण्यात आलेल्या चार पोलिसांची नक्षलवाद्यांनी निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले आहे. आज सकाळी त्या चार पोलिसांचे छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह रस्त्यावर पडलेले आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला असून पोलिस दलाला मोठा धक्का बसला आहे.
विजापूरचे पोलिस अधीक्षक के. एल. ध्रुव यांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुर भागातून अपहरण करण्यात आलेले राजू राम, मंगल सोढी, यजदेव यादव आणि रामा भज्जी या चौघांची हत्या करून त्यांचे मृतदेह गुदमागावाजवळील रस्त्यावर फकून देण्यात आले होते. हे चौघेही दोन दिवसांपूर्वी विजापूर येथे गेले होते, तेथून कुटरू येथे परत येत असताना सकनापल्ली गावाजवळ नक्षलवाद्यांनी बस थांबवून त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून जंगलात नेले अपहरण केले. अपहृत पोलिसांच्या शोधासाठी छत्तीसगड पोलिसांनी जोरदार शोधमोहिम सुरू केली होती, मात्र अखेर आज त्या पोलिसांचे मृतदेहच हाती लागले.