नवी दिल्ली : देश स्वच्छ ठेवण्यात कचरा वेचणाऱ्यांचे योगदान लक्षात घेत त्यांच्या सेवेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी सांगितले.देशात कचरा वेचणारे लाखो हात असून या क्षेत्रानेच देशाला वाचविले आहे. ते देशाच्या स्वच्छतेचे चांगले काम करीत असून मी त्यांच्या प्रयत्नांना मान्यता देण्याचे ठरविले आहे. आम्ही त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करू, असे ते येथे एका कचरा व्यवस्थापन कार्यक्रमात म्हणाले. कचरा उचलण्यात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तिघांना दीड लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार असून कचरा व्यवस्थापनात नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या तीन संघटनांचीही पुरस्कारासाठी निवड केली जाईल. महापालिकांनी कचरा व्यवस्थापनात वैज्ञानिक पद्धत अवलंबावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करणारी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसारखी संस्था स्थापन केली जावी. देशात दरवर्षी ६.२ कोटी टन कचरा निर्माण होतो. २०३० साली हे प्रमाण १६.५ कोटी टनांवर तर २०५० पर्यंत ४५ कोटी टनांपर्यंत जाईल. देशातील ६८ टक्के कचरा आणि घाणीवर प्रक्रिया केली जात नाही, ही चिंतेची बाब आहे. कचरा व्यवस्थापनाच्या नव्या मसुद्यात ही चिंता सोडविण्यावर भर देण्यात आला आहे, असेही जावडेकर म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)