हटले धुके : थंडीची तीव्रता झाली कमीनाशिक : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धुक्याच्या पखरणीतून आणि कडाक्याच्या थंडीतून सोमवारी नाशिककरांची सुटका झाली. किमान तपमानात वाढ झाली नसली, तरी धुके हटल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाचे वातावरण तयार झाले होते. नाशिकमध्ये तर ग्रामीण भागात गारपीटही झाली होती. राज्यातील सर्वात कमी तपमानाची नोंद मध्यंतरीच्या काळात नाशिकमध्ये करण्यात आली होती. पावसामुळे आलेली थंडीची लाट नंतर कमी होईल अशी अपेक्षा असताना, थंडीची तीव्रता कायम राहिली. पाऊस थांबल्यानंतर वाढलेल्या आर्द्रतेचा फटका नाशिककरांना बसला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण शहरच रात्रीपासून धुक्यात हरवून जात होते. सकाळच्या सुमारास बाहेर पडलेल्या नागरिकांना धुक्यातून वाट काढीत मार्गक्रमण करावे लागत होते. यासाठी वाहनांचे लाईटही सुरूच ठेवावे लागत होते. या धुक्यामुळे थेट जमिनीवर सूर्यप्रकाश येण्यासही अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे सकाळी १० वाजेपर्यंत धुके दाटलेले असायचे. त्या धुक्यातून प्रवास करताना त्यातील दवबिंदूंचा स्पर्श शरीराला व्हायचा. रविवारपर्यंत धुक्याचे वलय कायम होते. सोमवारपासून मात्र त्यात बदल होऊ लागला. सोमवारच्या सकाळी धुक्याचे प्रमाण कमी झाल्याने थंडीची तीव्रताही कमी झाली. परिणामी सूर्यकिरणे थेट जमिनीवर पोहोचू लागल्याने गारवाही कमी झाला. सोमवारी रात्रीच्या सुमारास थंडी कमी झाल्याने शहराची थंडीतून सुटका झाली. आगामी काही दिवस तपमान १२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार असले, तरी स्वच्छ वातावरणामुळे थंडी वाढण्याची शक्यता नसल्याचे वेधशाळेने कळविले आहे.
कडाक्याच्या थंडीतून नाशिककरांची सुटका
By admin | Updated: January 6, 2015 00:07 IST