ऑनलाइन टीम
जयपूर, दि. १० - मुस्लिम समाजाचा अयोध्या येथे राम मंदिर उभारणीस असलेला विरोध मावळेल व ते स्वत: या मुद्यावर सहमती दर्शवतील, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) व्यक्त केला आहे. विहिंपचे आंतरराष्ट्रीय महामंत्री चंपत राय यांनी पत्रकारांशी बोलताना या मुद्यावर भाष्य केले. 'मुस्लिम समाज हे (राम मंदिराबाबतचे) सत्य लवकरच स्वीकारेल असा आम्हाला विश्वास आहे. मंदिर उभारणीसाठी ते स्वत:हून सहकार्य करतील', असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाबाबतही मत मांडले. शेजारी राष्ट्रांशी आपण नेहमी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले पाहिजेत. 'मैत्री आणि शत्रुत्व यामध्ये कधी अंतर येऊ शकते, पण शेजा-यांशी असलेले संबंध कधीही बिघडू देऊ नयेत,' असे अटलजी यांचे म्हणणे होते, असेही राय यांनी सांगितले.