नवी दिल्ली : विमा उद्योगातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढविणे आणि देशातील कोळसा खाणींवरील सरकारी मक्तेदारी संपुष्टात आणून लिलावाच्या मार्गाने खासगी उद्योगांना या क्षेत्रात प्रवेश देणे हे आर्थिक सुधारणांच्या वाटेवरील दोन महत्त्वाचे निर्णय विरोधकांनी संसदेत रोखल्यानंतर त्यासाठी वटहुकुमाचा मार्ग स्वीकारण्याचे मोदी सरकारने बुधवारी ठरविले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही विषयांवरील संसदेत अडकलेले कायदे वटहुकूम काढून लागू करण्यास मंजुरी देण्यात आली. यापैकी कोळसा खाणींच्या लिलावासंबंधीचा वटहुकूम दुसऱ्यांदा काढण्यात येणार आहे.हे दोन्ही निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ते लागू करण्यासाठी संसदेच्या एका सभागृहाने ‘अनिश्चित काळ’ प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली तरी देश त्यासाठी थांबू शकत नाही, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जाहीर केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मोदींकडून विरोधकांना वटहुकुमी शह
By admin | Updated: December 25, 2014 02:56 IST