नवी दिल्ली : द्विपक्षीय संबंधाची विद्यमान स्थिती बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची न्यूयॉर्कमध्ये चालू महिन्यात संयुक्त राष्ट्र महासभेत (यूएनजीए) बैठक होण्याची शक्यता नाही.
यूएनजीएदरम्यान थोडा वेळ काढून अशा प्रकारची स्वतंत्र बैठक घेण्याचा दोन्ही बाजूंकडून प्रस्ताव आलेला नाही. भारताकडून अशा प्रकारच्या चर्चेचा प्रस्ताव येण्याची सध्यातरी शक्यता नाही.
दरम्यान, शरीफ यांनी मोदींना पाकिस्तानी आंब्याचा पेटारा पाठविला आहे. भारताशी संवाद किंवा फुटीरतावाद्यांशी चर्चा यापैकी एकाची निवड करा, असे भारताने स्पष्ट केल्यानंतरही पाकिस्तानने काश्मिरी फुटीरतावाद्यांशी चर्चा केली. त्यामुळे गेल्या महिन्यात भारताने परराष्ट्र सचिव पातळीवरील बैठक रद्द केली होती. या सर्व घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर शरीफ यांनी मोदींना आंबे पाठविले आहेत.
‘मँगो डिप्लोमसी’ दोन्ही देशांमधील वातावरण बदलणार काय, अशी विचारणा केली असता भारत-पाक पर्यवेक्षक म्हणाले की, पाकिस्तानी नेत्यांनी आंबे पाठविण्याची फार जुनी परंपरा आहे. 1999 मध्ये कारगिल युद्धानंतर शरीफ यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आंबे पाठविले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
शरीफ यांनी मोदींना आंबे पाठविले
4पंतप्रधान मोदी 26 ते 29 सप्टेंबर्पयत न्यूयॉर्कमध्ये असतील आणि शरीफदेखील 22 ते 27 सप्टेंबर्पयत तेथे राहणार आहेत.
4शरीफ यांनी मोदींसह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनादेखील आंबे पाठविले आहेत.