ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १० - गावागावांमध्ये ब्रॉडबँडचा व इंटरनेटचा प्रसार व्हावा यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी डिजिटल इंडिया या इनिशिएटिव्हसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. इंडियन कंपन्यांनी हार्डवेअर व सॉफ्टवेअरमध्ये उतरावे यासाठी प्रोत्साहन देण्याचा विचार व्यक्त करण्यात आला आहे. डिजिटल इंडिया या इनिशिएटिव्ह अंतर्गत नॅशनल रूरल इंटरनेट अँड टेक्नॉलॉजी मिशनच्या माध्यमातून गावांमध्ये ब्रॉडबँड नेटवर्क बसवण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे जेटली यांनी सांगितले.
त्याखेरीज तंत्रज्ञानातील कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व गावागावांमध्ये इंटरनेटचा प्रसार व्हावा यासाठी १०० स्मार्ट सिटी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ७,०६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे जेटली म्हणाले. तसेच लघू व मध्यम उद्योजकांना व्यवसाय विस्तार करता यावा यासाठी रिटेल व ई कॉमर्सच्या माध्यमातून उत्पादने विकण्याची मंजुरी देण्यात आल्याचे जेटली यांनी सांगितले.