नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जयंत मलैया आणि त्यांची पत्नी सुधा यांना गुरुवारी जबलपूर-निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये मथुराजवळ लुटण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी घडला. रेल्वेने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी रेल्वेत तैनात असलेल्या आरपीएफच्या तीन जवानांना तात्काळ निलंबित केले आहे.मलैया दाम्पत्य रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातून प्रवास करीत होते. दामोहहून दिल्लीला जात असताना मथुरेनजीक काही अज्ञात लोकांनी त्यांच्या डब्यात प्रवेश केला व खंजीरच्या धाकावर त्यांच्या जवळील सोन्याची साखळी, अंगठी व रोख रक्कम लुटली. गुरुवारी पहाटे ४ वाजता ही घटना घडली. दरम्यान, हा मुद्दा भाजपचे प्रल्हाद पटेल यांनी लोकसभेत उपस्थित केला. मंत्रीच जेथे सुरक्षित नाहीत तेथे सर्वसामान्य जनतेचे काय हाल असतील, हे आपण समजू शकतो. मलैया यांना लुटणारे दरोडेखोर रेल्वेची साखळी खेचून फरार झाले. आपल्याला रेल्वेच्या सीमेबाहेर गोळीबार करण्याचा अधिकार नसल्याचे आरपीएफच्या जवानांनी सांगितले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मध्य प्रदेशच्या मंत्र्यास रेल्वे प्रवासात लुटले
By admin | Updated: March 20, 2015 01:34 IST