टोलविरोधी आंदोलनाला भाजप नेत्याची पाठ (भाग - १)
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
टोलविरोधी आंदोलनाला भाजप नेत्याची पाठ
टोलविरोधी आंदोलनाला भाजप नेत्याची पाठ (भाग - १)
टोलविरोधी आंदोलनाला भाजप नेत्याची पाठ शोभाताई फडणवीस यांचा मनसर, बोरखेडीत रास्ता रोको : वाहतूक खोळंबली रामटेक/बोरखेडी: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या विधान परिषद सदस्य शोभाताई फडणवीस टोल वसुलीविरोधात बुधवारी रस्त्यावर उतरल्या. नागपूर जिल्ह्यातील मनसर आणि बोरखेडी येथील टोलनाके बंद करण्यात यावे, यासाठी त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनामुळे नागपूर-हैदराबाद आणि नागपूर-जबलपूर महामार्गावरील वाहतूक काही तासांसाठी विस्कळीत झाली. राज्यात सत्ता आल्यानंतर टोलनाके बंद करण्याची घोषणा भाजपने केली होती. मात्र राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. बुधवारी झालेल्या या आंदोलनाला जिल्ह्यातील भाजप नेते आणि आमदारांनी पाठ फिरविली, त्यामुळे टोल नाके बंद करण्यात भाजपात असलेले मतभेद पुन्हा दिसून आले. मनसर आणि बोरखेडी टोल नाके बंद करण्याची मागणी यापूर्वी आ. शोभाताई फडणवीस यांनी केली होती. बोरखेडी आणि मनसर टोलनाके असलेल्या मार्गाच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रामटेक तालुक्यातील मनसर आणि बुटीबोरी नजीकच्या बोरखेडी येथील टोल नाके बंद करण्यासाठी बुधवारी सकाळी ७ वाजतापासून शोभाताई फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात झाली. त्यामुळे या नाक्यांवर दिवसभर टोल वसुली बंद होती. मनसर येथील नाक्यावर दुपारी २ वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी मध्यस्थी करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या या प्रयत्नाला आंदोलनकर्त्यांनी विरोध केला. दुपारी १ वाजताच्या सुमारास शोभाताई फडणवीस आंदोलस्थळी पोहोचल्या. त्यावेळी त्यांनी टोलविरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले. या आंदोलनात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिक संघर्ष समिती, ट्रक वाहतूकदार असोसिएशन, ब्रिक्स असोसिएशन तसेच इतर सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलनात रामटेकचे आमदार. डी. मल्लिकार्जुन रेड्डी सहभागी झाले नव्हते. बोरखेडी नाक्याजवळ शोभाताईंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. येथे सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास आंदोलकांनी वाहने अडवायला सुरुवात केली. तासभरात नाक्याच्या दोन्ही बाजूूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. काही वाहनचालकांनी आडमार्गाने वाहने वळवून मार्ग काढला. मात्र, अनेकांना दोन ते अडीच तास ताटकळत रहावे लागले. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)