ऑनलाइन लोकमत
राजामुंद्री, दि. १४ - आंध्र प्रदेशातील राजामुंद्री येथील पुष्करम मेळाव्यात चेंगराचेंगरी होऊन १२ जण मृत्यूमुखी पडले आहेत. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील कुंभमेळ्याप्रमाणेच महत्व असलेला पुष्करम या कार्यक्रमाला मंगळवारी सकाळी गोदावरी नदीच्या तीरावर सुरूवात झाली. कार्यक्रमस्थळी भाविकांची मोठी गर्दी होती. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन एकच गोंधळ माजला व सुमारे १२ भाविकांना आपले प्राण गमवावे लागले.
दुर्घटनेचे वृत्त कळताच मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू घटनास्थळी रवाना झाले. युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले असून जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.