ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २१ - राजधानी दिल्लीत आम आदमी पक्ष पुन्हा सत्तेवर येईल अशी चर्चा सुरु असताना अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांची जाहीर माफी मागत पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांना सामोरे जायची तयारी दर्शवली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर दिल्लीत काँग्रेस किंवा भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा सत्तेवर यावे अशी मागणी आपच्या आमदारांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली होती. यासाठी केजरीवाल पुन्हा एकदा जनमत चाचणी घेणार असल्याची चर्चा दिल्लीत रंगली होती. यात भर म्हणजे मंगळवारी संध्याकाळी केजरीवाल यांनी दिल्लीतील नायब राज्यपालांना एक पत्र पाठवून दिल्ली विधानसभा भंग न करण्याची विनंती केली होती. त्यामुळे दिल्लीत पुन्हा आप सत्तेवर येईल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती.
या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी केजरीवाल यांच्या निवासस्थानी आपच्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर केजरीवाल यांनी पत्रकारांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट केले. 'दिल्लीतील सत्ता सोडल्याने मी आधी जनतेची जाहीर माफी मागतो. आम्ही गेल्यावर दिल्लीकरांना नाहक त्रास सोसावा लागला' असे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत दिल्लीत सत्तास्थापन करणे अशक्य असल्याने आम्ही पुन्हा निवडणुकांना सामोरे जायला तयार आहोत. निवडणुकीत बहुमत मिळवून आम्ही दिल्लीकरांना स्थिर सरकार देऊ असे त्यांनी स्पष्ट केले.