ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 15 - राज्यामध्ये सध्या बारावीचे विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करत असून परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत. यासाठी त्यांचे आई - वडिलही रात्रभर जागून मुलाला काय हवं, नको ते पाहत असतात. पण तुमच्यासोबत तुमचे आई-वडिलही परीक्षेला बसणार असतील तर ? हिंदी चित्रपट निल बट्टेमध्ये दाखवल्याप्रमाणे ख-या आयुष्यातही अशीच एक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये बुधवारी 15 मार्चपासून बारावीची परीक्षा सुरु झाली असून बिपलब मोंडल याच्यासोबत त्याचे आई-वडिलही परीक्षेची तयारी करत आहेत.
बिपलब सध्या बारावीची परीक्षा देत असून अरोंगघाटा हजरापूर शाळेचा तो विद्यार्थी आहे. बिपलबचे वडिल 43 वर्षीय बलराम एक शेतकरी असून त्याची आई 33 वर्षीय कल्याणी या गृहिणी आहेत. गेल्या काही वर्षांपासून संपुर्ण कुटुंब बारावीच्या परीक्षेची तयारी करत आहेत. विशेष म्हणजे बलराम आणि कल्याणी यांच्यासाठी त्यांचा मुलगा बिपलब हाच शिक्षक होता. बिपलबने त्यांच्याकडून परीक्षेची तयारी करुन घेतली.
'मी आठवीत असताना शाळा सोडली होती. वडिलांच्या निधनानंतर संपुर्ण घराची जबाबदारी माझ्यावर आल्याने मला पैसा कमावण्यासाठी शिक्षण सोडावं लागलं. जेव्हा आमचा मुलगा शाळेत जाऊ लागला तेव्हा आपणही शिकलं पाहिजे असा विचार माझ्या आणि पत्नीच्या मनात आला. 2014 मध्ये मी रबींद्र भारती ओपन युनिव्हर्सिटीमधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो. त्याच्या पुढच्या वर्षी 2015 मध्ये माझी पत्नीही परीक्षेत उत्तीर्ण झाली. जेव्हा आमच्या मुलानेही दहावीच्या परीक्षेत यश मिळवलं तेव्हा बारावीची परीक्षा त्याच्यासोबत देण्याचा आम्ही निर्णय घेताल. आमचं वय जास्त असल्याने आम्हाला प्रवेश देण्यास शाळांनी नकार दिला. शेवटी अरोंगघाटा हजरापूर शाळेत आम्हाला प्रवेश मिळाला', असं बलराम यांनी सांगितलं आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी बलराम आणि कल्याणी यांच्या जिद्दीचं कौतुक केलं आहे. 'आम्हाला बोर्डाच्या नियमांची कल्पना नव्हती. शाळेतील कर्मचा-याकडून कळलं की ओपन युनिव्हर्सिटीमधून परीक्षा उत्तीर्ण झालेले बारावीची परीक्षा देऊ शकतात. त्यांच्या उत्साह पाहून आम्हाला खूप आनंद होता. त्यांच्याकडे आम्ही विशेष लक्ष दिलं होतं', असं त्यांनी सांगितलं आहे.
बिपलब सांगतो की, 'मी माझ्या आई - वडिलांना शिकवलं. त्यांना इंग्रजी विषय कच्चा होता, यासाठी त्यांना आमच्या एका शेजा-याने इंग्लिश शिकवलं'. बिपलबची आई कल्याणी यांनी सांगितलं की, 'सरकारी योजनेतून आम्हाला शाळेकडून सायकल मिळाली आहे. आठवड्यातून चार वेळा आम्ही शाळेत जायचो. शाळेत अनेकदा आमचा अपमानही करण्यात आला, मात्र आम्ही त्याला जास्त गंभीरपणे घेतलं नाही'.