ऑनलाइन लोकमत
रांची, दि. २१ - नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या झारखंडकडे देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनण्याची ताकद आहे, क्षमतांचा पूरेपूर वापर केल्याल विकासात झारखंड गुजरातलाही मागे टाकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्त केला. रांची येथे पॉवर ग्रीड उद्धाटन समारंभात ते बोलत होते. जनेतेने भरघोस मतदान करून बहुमताने पक्षाला लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. जनतेने जो विश्वास दाखवला, जे प्रेम दिले ते विकासाच्या माध्यमातून सव्याज परत करेन असे आश्वासन त्यांनी दिले.
झारखंडमध्ये विकासाची क्षमता आहे, मात्र त्याचा अद्याप सर्वात जास्त उपयोग झालेला नाही. वीजनिर्मितीद्वारे झारखंड फक्त स्वत:च्या राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील अंधार दूर करून भले करू शकतो असे ते म्हणाले. राज्यांना उपेक्षित ठेवून देशाचा विकास होऊ शकत नाही असे सांगत चारही दिशातील सर्व राज्यांचा विकास झाल्यास भारताचा संतुलित विकास होईल, असेही ते म्हणाले. तसेच देशाच्या पूर्व भागातील राज्यांमध्ये विकास कामांना भरपूर वाव असल्याचे त्यांनी सांगितले.
झारखंड राज्य निर्माण होऊन १४ वर्षांचा कालावधी लोटला आहे, सध्या हे राज्य महत्वाचा अवस्थेत आहे. आत्ता जर त्याच्या विकासाकडे नीट लक्ष दिले तर या राज्याचा कायापालट होऊ शकतो, त्यासाठी मेहनत, कामातील सातत्य व प्रामाणिकपणाची गरज असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले.