ऑनलाइन टीम
पाटणा, दि. २२ - लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी नामक वादळाने बिहारमधील राजकीय समीकरणे उद्धवस्त केली असतानाच बिहारमधील सत्ताधारी जदयूला लालूप्रसाद यादव यांच्यारुपात एक नवीन मित्र मिळाला आहे. विधानसभेत बहुमताच्या चाचणीत राष्ट्रीय जनता दलाचे आमदार जदयूला पाठिंबा देणार आहेत.
लोकसभा निवडणुकीतील बिहारमध्ये जदयूच्या निराशाजनक कामगिरीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा दिला आहे. बिहारच्ये मुख्यमंत्रीपदासाठी जीतनराम मांझी यांची निवड करण्यात आली आहे. सध्या बिहार विधानसभेत जदयूकडे बहुमत असून काँग्रेस, अपक्ष व सीपीआय (एम)च्या आमदारांच्या पाठिंब्यावर जदयूचे सरकार तारले जाऊ शकते.
मात्र बिहारमध्ये मोदींचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी एकेकाळचे कट्टर विरोधक जनता दल संयुक्त व लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हे दोन्ही पक्ष आता एकत्र आले आहेत. राजद आणि जदयूच्या युतीमध्ये भाजपसमोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे.