ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. २१ - जर महाराष्ट्रामध्ये ए. आर. अंतुले व बंगालमध्ये घनी खान चौधरी हे मुस्लीम समाजातले असून मुख्यमंत्री होऊ शकतात मग जम्मू व काश्मिरचा मुख्यमंत्री हिंदू का असू शकत नाही असा प्रश्न नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस आघाडी सरकारातले एक मंत्री शामलाल शर्मा यांनी उपस्थित केला आहे. १९४७ पासून जम्मू व काश्मिरमध्ये केवळ मुस्लीम व्यक्तिच मुख्यमंत्री झाल्याचे त्यांनी दाखवून दिल्यानंतर व अशी मागणी केल्यावर जम्मूतल्या कार्यक्रमात त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. जर हा देश सेक्युलर आहे आणि धर्मावर वा जातीवर आधारीत भेद होत नसेल तर जम्मू व काश्मिरमध्ये हिंदू व्यक्ती मुख्यमंत्री का असून नये असे शर्मा म्हणाले.
जम्मूसाठी प्रादेशिक आयोग असावा अशी लोकांनी मागणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने जम्मू व काश्मिरमध्ये हिंदूंच्या भावनेला हातन घातल्याने शर्मांच्या वक्तव्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राज्याच्या सात हजार सरकारी कर्मचा-यांमध्ये अवघे २०० जण जम्मूचे असल्याचे सांगत राज्य सरकारमध्ये जम्मूला योग्य प्रतिनिधीत्व मिळत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले व खेद व्यक्त केला.
याआधी चार वर्षांपूर्वी शर्मा यांनी काश्मिरला स्वातंत्र्य जम्मूला स्वतंत्र राज्याचा दर्जा व लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी करत खळबळ उडवली होती.