ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड अपमान सोसला, त्यांची अवहेलना झाली, हेटाळणी झाली परंतु त्यांनी कधीही देश सोडायचा विचारही केला नाही, उलट भारताला सशक्त बनवण्यासाठी अथक कार्य केले अशा शब्दांमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बाबासाहेबांचं केवळ कौतुक केलं नाही तर आमिर खानला उल्लेख न करता टोला लगावला आहे.
राजनाथ सिंह यांनी यावेळी सेक्युलर व सोशालिस्ट हे शब्द मूळच्या प्रिएंबलमध्ये नव्हते ते नंतर घुसडण्यात आले असं सांगताना, जर हे शब्द महत्त्वाचे वाटत असते तर बाबासाहेब आंबेडकरांनी ते सुरुवातीलाच वापरले असं राजनाथ म्हणाले. मात्र, आज सेक्युलर या शब्दाचा प्रचंड गैरवापर होत असल्याचे सांगितले. विरोधकांनी यावर प्रचंड गदारोळ घातला. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तर बाबासाहेब आंबेडकर मूळचे भारतीय होते, तुम्ही आर्यन बाहेरून आलेले आहात, परके आहात असा थेट आरोप राजनाथ सिंह व भाजपावर केला.
सेक्युलर या शब्दाचा अर्थ पंथनिरपेक्ष आहे, धर्मनिरपेक्ष असा असल्याचे सांगत तो त्याच अर्थी वापरायला हवा असा आग्रह राजनाथ सिंह यांनी धरला आहे.
मी बोलतोय ते अनेकांना रुचणार नाही, परंतु हे बोलणं आवश्यक असल्याचं सांगत प्रिएंबलमध्ये सेक्युलर व सोशालिस्ट शब्द घुसडण्याचा उल्लेख जाणुनबूजून केला.
राजनाथ सिंह यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
- सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष नसून पंथनिरपे७ असा आहे आणि तो याच अर्थाने वापरायला हवा असा माझा आग्रह राहील.
- पारसी व ज्यू या दोन्ही समाजांना जगभरामध्ये सन्मानानं वागवणारा व धार्मिक स्वातंत्र्य देणारा देश केवळ भारत आहे. एवढंच नाही मुस्लीमांमधील सगळेच्या सगळे समाजघटक केवळ भारतात आढळतात.
- भारतामध्ये जर कुठल्या शब्दाचा वारेमाप गैरवापर होत असेल तर तो शब्द सेक्युलर हा आहे. भारताचा परीचयच पंथनिरपेक्ष असा आहे, जो बाबासाहेबांना अभिप्रेत होता. त्यामुळे त्यांना हा शब्द प्रिएंबलमध्ये वापरण्याची गरज वाटली नाही.
- सेक्युलर व सोशालिस्ट शब्द प्रिएंबलमध्ये ४२व्या घटनादुरुस्तीमध्ये जोडण्यात आले आहेत. ते आवश्यक वाटले असते तर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीलाच हे शब्द वापरले असते.
- बाबासाहेब आंबेडकर मूल भारतीय आहेत, ते कशाला देश सोडून पळतील. तुम्ही बाहेरून आला आहात, आर्यन बाहेरून आलेत असं सांगत मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा व राजनाथ सिंह यांच्यावर हल्ला चढवला.
- घटनेमध्ये, प्रिएंबलमध्ये कुठलाही बदल करायचा नाही असं असतानाही, सेक्युलर व सोशालिस्ट हे शब्द मागाहून घालण्यात आले. यांना माझा विरोध नाही, परंतु ही बाब सगळ्यांना माहीत हवी म्हणून उल्लेख करण आवश्यक आहे.
- आरक्षण ही राजकारणाचा मुद्दा नाही, तर सामाजिक, आर्थिक समानतेसाटी बाबासाहेबांनी आरक्षण महत्त्वाचं मानलं आणि तिच्यासंदर्भात वेगळा विचार शक्य नसल्याचं आमचं मत आहे.
- अस्पृश्यतेच्या विरोधात बाबासाहेबांनी प्रचंड मोठं आंदोलन केलं, एवढंच नाहीतर समानतेएवढं महत्त्वाचं काहीच नाही याचा पुरस्कार बाबासाहेबांनी कायम केला. त्याच उद्देशातून त्यांनी आरक्षणाचा पुरस्कार केला.
- भारतामध्ये अनेक महत्त्वाच्या संस्था उभारण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान खूप महत्त्वाचं आहे. श्रमिक कल्याणासाठी कायदेशीर तरतुदींवर बाबासाहेबांनी काम केलं तसेच तळागाळातल्या समाजाला उपयुक्त अनेक योजनांमध्ये बाबासाहेबांच्या बुद्धीचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे.
- स्वतंत्र भारतामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं योगदानही महत्त्वाचं असून ते कुणालाही नाकारता येणार नाही.
- शेकडो संस्थानांमध्ये विभागलेल्या भारताला वल्लभभाई पटेलांनी जोडलं असेल तर घटना समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला एकत्र ठेवण्याचं अजोड काम केलंय.
- अनेकवेळा उपेक्षा झाली, अपमान सहन करायला लागला परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही देश सोडून जाण्याचा विचारदेखील केला नाही, उलट भारत सशक्त करण्याचा संकल्प केला.
- भारताला मिळालेली घटना ही अनेक दिग्गजांनी दिलेल्या योगदानाचा परिणाम आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेलांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे.