भारताने अमेरिकेला जबर धक्का दिला आहे. भारताची गुप्तचर संस्था रॉ विरोधात अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोग (USCIRF)ने प्रतिबंध लावण्याचे कारस्थान रचले होते. हा रिपोर्टच भारताने झिडकारून लावत हा आयोगच चिंतेचा विषय असल्याचे जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
या अहवालात भारताची गुप्तचर संस्था 'रॉ'वर हत्येच्या कटात कथित भूमिकेसाठी निर्बंध घालण्याची शिफारस करण्यात आली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या कारस्थानाविरोधात एक कठोर शब्दांत निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात लोकशाही आणि सहिष्णुतेचे प्रतीक म्हणून असलेली भारताची प्रतिमा खराब करण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे म्हटले आहे.
यूएससीआयआरएफच्या ताज्या अहवालात भारताविरोधात आजही पक्षपाती आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित मूल्यांकन जारी करण्याची पद्धत सुरूच आहे, असा गंभीर आरोप परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी केला आहे.
वेगळ्या घटनांना चुकीच्या पद्धतीने प्रस्तूत करून भारताच्या चैतन्यशील बहुसांस्कृतिक समाजावर शंका निर्माण करण्याचे USCIRF चे सततचे प्रयत्न सुरु आहेत. हे प्रयत्न धार्मिक स्वातंत्र्याबद्दलच्या खऱ्या चिंतेऐवजी जाणीवपूर्वक केलेला अजेंडा दर्शवत आहेत. प्रत्यक्षात यूएससीआयआरएफलाच 'चिंतेचा विषय' मानले पाहिजे, असे या निवेदनात स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.
अमेरिका व शेजारी देशांमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांना शरण देण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून या नेत्यांचा खात्मा केला जात आहे. यामागे भारतीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचे आरोप अमेरिका आणि कॅनडा करत आहेत. यासाठी भारताचा एक वरिष्ठ नेता आणि रॉचा हात असल्याचा त्यांचा दावा आहे. हा दावा भारताने खोडून काढलेला आहे. यानंतर आता USCIRF ने रॉवरच बंधणे आणण्याचे प्रस्तावित केले आहे. हा अहवाल भारताने कठोर शब्दांत फेटाळून लावला आहे.