नवी दिल्ली : भारत चीनपेक्षा कमी किमतीत लढाऊ विमान आणि क्षेपणास्त्रांची विक्री करू शकतो, असे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे एका वक्तव्यात शस्त्र निर्यात वाढवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला होता. त्या पार्श्वभूमीवर डीआरडीओने भारत लढाऊ विमान आणि क्षेपणास्त्रांची विक्री करू शकतो आणि त्यांचे उत्पादन शुल्क चीनसारखे देश विक्री करीत असलेल्या शस्त्रांपेक्षा कमी असणार आहे, असे म्हटले आहे. शस्त्रप्रणालीच्या निर्यातीसाठी देशाला एका ‘धोरणात्मक व्यवस्थे’ची आवश्यकता आहे. डीआरडीओने मित्र देशांना निर्धारित वेळेत शस्त्रांच्या विक्रीसाठी ‘एक खिडकी मान्यता’ची सूचना केली आहे, असे संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे प्रमुख अविनाश चंदर म्हणाले. निर्यात केली जाऊ शकेल अशा उपकरणांची आमच्याकडे यादी आहे. यामध्ये हलके युद्धविमान ‘तेजस’, ‘आकाश’ हवाई संरक्षण प्रणाली, ‘प्रहार’ क्षेपणास्त्र आणि ‘ब्रह्मोस’ क्रूझ मिसाईलसह अनेक प्रणालींची निर्यात केली जाऊ शकते, असेही चंदर म्हणाले. आम्ही शस्त्रप्रणालींच्या निर्यातीची शक्यता आणि एक धोरणात्मक व्यवस्था विकसित करण्याच्या प्रक्रियेवर चर्चा करीत आहोत, असेही ते म्हणाले. भारताला आपल्यासाठी शस्त्रास्त्र निर्मिती करायला हवी आणि इतर देशांनादेखील त्याचा पुरवठा करायला हवा, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अलीकडे केले होते. त्यासंदर्भात डीआरडीओच्या अध्यक्षांना प्रश्न विचारण्यात आला होता. (वृत्तसंस्था)
क्षेपणास्त्रांच्या निर्यातीस भारत सज्ज
By admin | Updated: June 23, 2014 05:06 IST