ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली दि. १६ - जम्मू काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा करून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारताने पाकिस्तानकडे तीव्र शब्दांत नाराजी नोंदवली आहे. अखनूरमध्ये बुधवारी झालेल्या गोळीबारात एक महिला ठार तर बीएसएफच्या जवानासह तीन जण जखमी झाले होते.
याप्रकरणी भारताने पाकच्या उच्चायुक्तांना खडे बोल सुनावत नाराजी नोंदवली. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाकडे तसेच दिल्लीतल पाकिस्तानच्या उच्चायुक्तांकडे या घटनेचा कडक शब्दांत निषेध नोंदवल्याचे समजते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू दौऱ्यावर येणार असताना पाकिस्तानी सैनिकांनी बुधवारी जम्मू जिल्ह्याच्या अखनूर सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा करून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला तर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानासह तीन जण जखमी झाले. बीएसएफ जवानांनीही प्रत्युत्तरात कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती. भालवाल भार्थ, मालाबेला, सिदेरवान आदी परिसरासह सीमेवरील चौक्यांनाही याचा फटका बसला
दरम्यान पाकिस्तानच्या कारवाया आजही सुरू असून आज सकाळी त्यांनी पूंछ येथे गोळीबार करून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेच.