ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - दररोज भारतीय चौक्यांनर गोळीबार करुन शस्त्रसंधींचे उल्लंघन मारणा-या पाकिस्तानने 'भारतानेच गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल ५७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे' असा कांगावा बुधवारी केला आहे. फुटीरवादी नेत्यांशी चर्चा करण्याची जूनी पद्धत असून यात गैर काहीच नाही असे सांगत पाकने जम्मूतील फुटीरवादी नेत्यांसोबतच्या चर्चेची पाठराखण केली आहे.
जम्मू काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांसोबत पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दूल बसित यांनी मंगळवारी चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी पाकचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन पाकची भूमिका मांडली. ' दक्षिण आशियात शांतता निर्माण करण्यास पाकिस्तान सरकार कटीबद्ध असून स्वातंत्र्यदिनी मोदींनी सार्क देशांनी सहकार्य करण्याची भूमिका मांडली त्याचे आम्ही स्वागत करतो' असे बसित यांनी सांगितले. भारताशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी पाक नेहमीच प्रयत्नशील असतो. जम्मूतील फुटीरवादी नेत्यांशी चर्चा करण्याची जूनी परंपरा आहे. काश्मिरी जनताच शांतता प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे असे बसित यांनी म्हटले आहे. शस्त्रसंधींच्या उल्लंघनाविषयी विचारले असता बसित यांनी भारतावरच शस्त्रसंधींचे खापर फोडले. भारतानेच तब्बल ५७ वेळा शस्त्रसंधींचे उल्लंघन केले असा कांगावाही त्यांनी केला.