ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - भ्रष्टाचार हा वाळवीप्रमाणे या देशात सगळीकडे पसरलाय. ज्याप्रमाणे घरात वाळवी लागली की घराच्या प्रत्येक काना कोप-यात इंजेक्शन द्यावं लागतं तेव्हा कुठे अनेक महिन्यांनी वाळवी जाते, त्याप्रमाणे भ्रष्टाचाराशी लढाई लढायला लागेल, असं सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मी भ्रष्टाचार संपवून दाखवेन अशी भीष्मप्रतिज्ञा ६९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावरून बोलताना केली. माझ्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही असं सांगताना, ही लढाई गाव पातळीपर्यंत लढावी लागेल परंतु जर सव्वाशे कोटी भारतीयांनी साथ दिली तर ही लढाई आपण जिंकू असा विश्वासही त्यांनी दिला.
गेल्या ६० वर्षात देशाने अनेक समस्या सोडवल्या नाहीत, उलट अनेक समस्या गंभीर बनल्या अशी टीका करत आता मात्र आपण समृद्ध व सुखी भारताच्या दिशेने वाटचाल करत आहोत असे मोदी म्हणाले. २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत, त्यावेळी प्रत्येक नागरिकाला स्वताच घर असेल, प्रत्येकाला रोजगार असेल आणि कुणीही उपाशी झोपणार नाही असा संकल्प आपण सव्वाशे कोटी भारतीयांनी करूया असे आवाहनही मोदी यांनी केले.
नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे पुढीलप्रमाणे:
- २०२२ मध्ये स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. आत्ताच संकल्प करुया की आम्ही देशाच्या भल्यासाठी अमुक अमुक काम करूया.
- वन रँक वन पेन्शन हा विषय प्रत्येक सरकारपुढे आला. प्रत्येक सरकारने वचनं दिली पण समाधान नाही झालं. मी पण अजून करू नाही शकलो. मी आज पुन्हा जवानांना एकदा विश्वास देतो, तिरंग्याच्या खाली उभं राहून मी तत्वत: आम्ही वन रँक वन पेन्शन स्वीकारलंय. सगळ्यांना न्याय मिळायला हवं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि सुखद परिणामाची आशा करतोय. तांत्रिक बाबींवर काम सुरू आहे.
- ज्या नोक-यांमध्ये विशेष प्रावीण्य लागत नाही अशा छोट्या छोट्या नोक-यांसाठी इंटरव्यह बंद करा नी मेरीटच्या आधारावर ऑनलाइन नोक-या द्याव्यात असा माझा राज्यांना आग्रह आहे. - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- ज्या उद्योगांमध्ये जास्त रोजगार देण्यात येईल त्या उद्योगांना विशेष आर्थिक योजना आखण्यात येईल.
- बँकांच्या लोकांकडून मला खूप अपेक्षा आहे. बँकांच्या सव्वा लाख शाखा आहेत. त्यांना मी एक काम देऊ इच्छितो. हे वर्ष डॉ आंबेडकरांचं सव्वाशे वर्ष जयंतीचं आहे. जिथे आदिवासी, दलित आहेत प्रत्येक शाखा एका दलिताला किंवा आदिवासीला स्टार्ट अप कर्ज द्यावंं. सव्वा लाख उद्योजक तयार होतील. तसंच महिलांना संधी द्यावी. यामुळे प्रचंड बदल घडेल.
- स्टार्ट अपच्या दुनियेत आपण जगात एक नंबर आपण बनू शकतो की नाही.. स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया हा आपला मानस असायला हवा.
- जर सव्वाशे कोटी भारतीय संकल्प करूया की १८,५०० गावांमध्ये १००० दिवसांत वीज पोचवुया.
- आजही १८,५०० गावांमध्ये वीजेचे खांब नाहीत. जर जुन्या पद्धतीने गेलो तर १० वर्ष लागतिल. सरकारी बाबू म्हणाले चार ते सहा वर्षात हे काम करू. पण आमचा संकल्प आहे १००० दिवसांमध्ये १८,५०० गावांमध्ये वीजेचे खांब पोचवण्याचा विडा आपण उचलुया.
- जेवढं महत्त्व कृषि विकासाला आहे तेवढंच शेतकरी कल्याणाला महत्त्व आहे. आता कृषि खाते हे कृषि व किसान कल्याण मंत्रालय म्हणून ओळखलं जाईल. सरकार केवळ शेती नाही तर शेतक-यांसाठी स्थायी व्यवस्था करणार.
- बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, ईशान्येची राज्ये विकासासाठी महत्त्वाची आहे. त्यासाठी आम्ही गॅसची पाइपलाइन टाकण्याचा प्रयत्न आहे. चार युरिया खताचे कारखाने पूर्वेकडील राज्यात जे बंद पडले होते ते सुरू करण्याच्या दिशेने काम सुरू आहे.
- युरीया नीम कोटिंग ही कल्पना आम्ही राबवतोय. युरियामध्ये प्रचंड प्रमाणात चोरी होते. आम्ही नीम कोटिंग युरियाचं काम १०० टक्के केलं ज्यामुळं शेतक-यांखेरीज हा युरिया कोणी वापरू शकत नाही. त्यामुळे शेतीलाही फायदा होईल. शेतक-यांनी पण लक्षात ठेवा नीम कोटिंग युरियाच वापरा, तो सरकारीच असेल याची खात्री आहे.
- शेतीचं नुकसान ५० टक्के असेल तर भरपाई मिळायची आम्ही हीमर्यादा ३० टक्क्यांवर आणली. जे काम ६० वर्षात झालं नाही ते आम्ही केलं.
- शेतक-यांसाठी सिंचनासाठी ५० हजार कोटी रुपये खर्च करण्याचा आमचा मानस आहे. पर ड्रॉप मोअर क्रॉप या दिशेने आम्ही पुढे जात आहोत.
- आमम्ही येण्यापूर्वी महागाई १० टक्क्यांपेक्षा जास्त होती. आम्ही प्रचंड प्रयत्न केला आणि ती महागाई ३ - ४ टक्क्यांच्या जवळपास आणली.
- मनी लाँडरिग अॅक्ट अंतर्गत झालेल्या दाव्यांमध्ये दहा वर्षात १० हजार कोटी रुपयांची प्रकरणे बाहेर आली त्यातली ४५०० कोटी रुपयांची प्रकरणे गेल्या १० महिन्यातली आहेत, यावरून आमचा संकल्प दिसतो.
- आम्ही सत्तेत येण्यापूर्वी ८०० भ्रष्टाचाराच्या केसेस होत्या. आम्ही आल्यावर ही संख्या १८०० झाली आहे. यावरून भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याचा आमचा मानस दिसतो.
- काळ्या पैशासंदर्भातल्या कायद्यामुळं खूप लोकांना त्रास होतोय. पण आजार जेवढा मोठा तेव्हा कडू औषध घ्यायला लागतं. इंजेक्शन घ्यायला लागतं. साईड इफेक्ट होतात. हा धोका पत्करून आम्ही त्या दिशेने चाललोय. आता काळा पैसा बाहेर पाठवू शकत नाहीत, हा फायदा होणारच आहे. काळा पैसा माफी योजनेनंतर सुमारे ६५०० कोटी रुपये तिजोरीत यायला लागलाय.
- काळ्या पैशांसंदर्भात जे काम तीन वर्षे झालं नाही ते आम्ही एका आठवड्यात केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली समिती नेमली. विविध देशांशी सहकार्य करार केलं. एकामागोमाग एक पावलं उचलली. कठोर कायदा केला.
- भ्रष्टाचारमुक्त भारत मी करून दाखवणार. हे काम सोपं नाहीये. ती वाळवी आहे. पण आपण हे काम करू.
- FM रेडियोचा लिलाव करू नका यासाठी माझ्यावर खूप दबाव टाकण्यात आला. मी म्हटलं की नाही लिलाव होणार. ८०- ८२ शहरात लिलाव सुरू आहे आणि हजार कोटींच्या पुढे लिलावाची रक्कम आत्ताच गेली आहे. ही रक्कम गरीबांच्याच कामाला येईल.
- कोळसा प्रकरणाबद्दल मी बोलतोय, याकडे राजकीय दृष्टीकोनातून बघू नका. आम्ही बोलायचो हजारो कोटी पण मनात वाटायचं हा आकडा एवढा नसेल.. पण ज्यावेळी कोळसा खाणींचा लिलाव केला तेव्हा तीन लाख कोटींनी तिजोरी भरेल हे कळलं. हे आम्ही भाषण नाही केलं, करून दाखवलं.
- मध्यमवर्गाच्या लोकांनी गॅस सबसिडी परत केली. गरीबांच्या कडे या सबसिडीचा लाभ होईल त्यांच्या घरी चूल पेटेल याचा विचार करा.
- गरीबांच्या पैशाला आम्ही लुटू देणार नाही. आम्ही एक विनंती केली तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असाल तर कशाला LPG सबसिडी का घेता. आज मी अभिमानानं सांगतो की आजपर्यंत २० लाख लोकांनी गॅस सबसिडी नाकारली. हा आकडा लहान नाही.
- थेट सबसिडी देण्याच्या योजनेमुळे दलाली बंद झाली, मोठ्या मोठ्या घोषणा नाही केल्या. आज मी सांगू इच्छितो की यामुळे जवळपास १५ हजार कोटी रुपये जे चोरी होत होता तो बंद झाला भ्रष्टाचार बंद झाला.
- मी सबसिडी बंद केली नाही तर लोक म्हणतिल मोदीमध्ये काही फारसा दम नाही. आम्ही LPG सबसिडी थेट बँक खात्यात जमा करण्याची योजना आणली.
- मी १५ हजार कोटींची सबसिडी बंद केली असती तर कौतुकाचा वर्षाव झाला असता, की हा माणूस दमदार आहे.
- भ्रष्टाचार वाळवीसारखा पसरलाय. पण आपण भ्रष्टाचारमुक्त होऊ शकतो. घरात वाळवी जशी सगळीकडे पसरते आणि सगळ्या घरात दर महिन्याला इंजेक्शन दिलं की अनेक वर्षांनी मुक्ती मिळते. या देशाला पण भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी कोट्यवधी उपायांची गरज आहे.
- भ्रष्टाचार ही मोठी समस्या आहे. आजारी व्यक्ती निरोगी कसं व्हायचं याचा सल्ला सगळे देतात.. हीच अवस्था भ्रष्टाचाराची आहे. सगळे एकमेकांना भ्रष्टाचाराबद्दल सल्ले देतात.
- कायदे काळाप्रमाणे असायला हवेत, सोपे असावेत, सुटसुटीत असायला हवे. असे कायदे सुटसुटीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- कामगारांना विशेष ओळखपत्र दिलं, की जिथे कुठे तुम्ही जाल तुमच्या बरोबर तुमचे पैसे जातील... तसेच २७ हजार कोटी रुपये गरीबांना परत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय ज्यामुळे त्यांना विविध लाभ होतील. या क्षेत्रातल्या लोकांनी सरकारी तिजोरीत २७ हजार कोटी रुपये जमा केले. परंतु नोक-या बदलल्यामुळे ते मजूर घेऊ शकत नाहीत.
- सुटाबुटातल्या लोकांना आपण नमस्कार करतो, परंतु दुध विकणारा, वर्तमान पत्र विकणारा, रिक्षावाला याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन ठीक नाही. श्रमांचं महत्त्व, श्रमिकांचा गौरव हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य हवं, आपला स्वभाव असायला हवा, ही आपली वृत्ती असायला हवी.
- मुद्दा सव्वा चार लाख शौचालयं बांधण्याचा नाही तर हे काम आम्ही करू शकतो, टीम इंडिया सफल होई शकते या आत्मविश्वास निर्माण होण्याचा आहे.
- गेल्या वर्षी माझ्या मनात आलं ते मी सांगितलं की शाळांमध्ये मुलींसाठी व मुलांसाठी वेगळी शौचालय हवेत... तेव्हा कळलं की सव्वा दोन लाख शाळांमध्ये चार लाखांपेक्षा जास्त शौचालयांची गरज आहे. टीम इंडियाचं अभिनंदन.. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. जवळपास हे लक्ष्य आपण हे पूर्ण केलं. राज्य सरकार, शिक्षण क्षेत्र अशा सगळ्यांचं अभिनंदन.
- स्वच्छतेचा सगळ्यात मोठा ब्रँड अँबॅसॅडर कोण आहे याचा विचार केला तर लक्षात येईल की लहान लहान मुलांनी स्वच्छ भारत अभियानात भाग घेतला नी मोठ्यांना सांगितलं की घाण करू नका... अशा करोडो लहान मुलांना नमन. ज्या देशाचा बालक स्वच्छतेसाठी प्रतिबद्ध असेल तो देश स्वच्छ होणारच होणार... घाणीविषयी घृणा निर्माण होणारच.
- गेल्या वर्षी मी शौचालय, स्वच्छतेविषयी बोललो. देशाला आश्चर्य वाटलं. लाल किल्यावर शौचालयामध्ये वेळ फुकट घालवतात. पण कुठल्याही पाहणीत आढळलंय की स्वच्छतेचं अभियान सगळ्यात महत्त्वाचं ठरलंय. टीम इंडिया, सेलिब्रिटी, अध्यात्मिक लोक, प्रसारमाध्यमं अशा सगळ्यांनी स्वच्छतेचं व्रत घेतलं या सगळ्यांचं ह्रदयापासून अभिनंदन.
- योजना कुठली सरकार करत नाही... सगळे करतात, फिती कोण नाही कापत सगळे कापतात... नव्या योजनांच्या घोषणा कोण करतं की नाही... सगळी सरकार करतात... महत्त्वाचं हे आहे की कुठल्या घोषणा वास्तवात उतरतात. आमच्या योजनांमध्ये १०० दिवसांमध्ये १० कोटी लोकांनी सहभाग घेतला हे वैशिष्ट्य आहे. हे टीम इंडियाचं यश आहे.
- अटल पेन्शन योजना, जीवन सुरक्षा विमा योजना अशा योजनांच्या माध्यमातून गरीबांना आम्ही आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे.
- फायनान्शियल इन्क्लयुजनमुळे गरीबांचा भार व्यवस्थेवर पडतो असे एक म आहे, परंतु मी याच्याशी सहमत नाही. पिरॅमिडचा पाया जसा मोठा असतो त्याप्रमाणे विकासाच्या पिरॅमिडचा पाया मजबूत असेल आणि देशाच्या शेवटच्या व्यक्तीची खरेदीची शक्ती वाढली तर विकास होतोच होतो. आम्ही गरीबांच्या विकासावर भर देतोय.
- बँकाची शाखा उघडणं हीच मोठी बाब मानली जायची, खरंतर ही सोपी गोष्ट आहे पण बँकांमध्ये खाती उघडण्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागते. त्यामुळे बँकांच्या सगळ्या कर्मचा-यांचे मी आभार मानतो कारण त्यामुळे येत्या काळात खूप बदल घडणार आहे.
- गरीबांच्या श्रीमंतीच्या बळावर ही टीम इंडिया पुढे जाईल असा मला विश्वास आहे.
- आम्ही निश्चित कालावधीत काम करण्याचा संकल्प केला आणि १७ कोटी लोकांनी पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत बँकांमध्ये खाती उघडली. शून्य शिल्लक हा आमचा संकल्प होता. परंतु माझ्या देशाच्या गरीबांच्या श्रीमंतीला माझा लाल किल्यावरून शतशत नमस्कार. कारण या गरीबांनी २० हजार कोटी रुपये बँक खात्यांत जमा केले.
- गेल्या वर्षी मी जनधन योजनेचा उच्चार केला. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी पण ४० टक्के लोकांना बँक सुविधा नव्हती. आम्ही फायनान्शियल इन्क्ल्युजनचा विचार मांडला. गरीबांना आर्थिक जगताशी जोडण्याचा प्रयत्न केला.
- गरीबाला गरीबीतून बाहेर यायचंय. शासनव्यवस्थेची सार्थकता गरीबांच्या कल्यणासाठी असण्यातच आहे.
- लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. टीम इंडियाचा एकच जनादेश आहे. तो जनादेश असा आहे की आमच्या सगळ्या व्यवस्था, योजना गरीबांच्या कामी यायला हव्यात.
- आम्ही जे काही करतोय, जिथे कुठे जायचा प्रयत्न करतोय ते सव्वाशे कोटी लोकांच्या टीमसह करतोय. या सगळ्यांची भागिदारी अत्यंत महत्त्वाची आहे.
- जातिवाद आणि संप्रदायवाद यांना विकासाच्या माध्यमातून संपवायला हवं. देश सव्वाशे कोटी लोकांच्या टीम इंडियाच्या भरोशावर पुढे जात आहे.
- प्राचीन परंपराच्या बरोबरच भविष्याच्या उज्ज्वल स्वप्नांच्यासह देश जगत आलाय आणि एकता ही महत्त्वाची गोष्ट असून जातिवाद, संप्रदायवाद यांना कुठल्याही रुपात त्याला थारा देता कामा नये.
- विविधता, विशालता याचप्रमाणे प्रत्येक भारतीयाच्या मनात सरळता आहे तसेच जगभरातल्या भारतीयांच्या मनाल एकता आहे हेच भारताचे वैशिष्ट्य आहे.
- अनेक भारतीयांनी जगभरात भारताचं मस्तक अभिमानानं ताठ ठेवलं, त्या सगळ्यांचं अभिनंदन.
- अनेकांनी या स्वातंत्र्यांसाठी बलिदान केलं, तुरुंगवास पत्करला, त्यांनी संकल्प सोडला नाही.. अशा स्वातंत्र्यसेनानींना कोटी कोटी वंदन.
- आझादीनिमित्त सव्वाशे कोटी भारतीयांना शुभकामना. १५ ऑगस्ट ही सव्वाशे कोटी लोकांच्या स्वप्नाची व संकल्पाची पहाट आहे.