ऑनलाइन लोकमत
फैजाबाद, दि. १४ - देशातील सर्वात मोठी मुस्लिम शिक्षण संस्थान असलेले दारूल उलूम देवबंद आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या फतव्यांमुळे चर्चेत राहिले आहे. मात्र यावेळी देवबंदच्या एका वेगळ्या फतव्याची चर्चा सुरू आहे. ' या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांवर तिरंगा झेंडा फडकवण्याचे तसेच सर्व मुस्लिम नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन या फतव्याद्वारे करण्यात आले आहे.
देशातील सर्व मुस्लिम नागरिकांनी आपल्या घरावर तसेच कार्यालयांवर तिरंगा फडकवावा, तसेच मोठ्या उत्साहाने देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे देवबंदने म्हटले आहे.
' देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात दाऊल उलूमच्या अनेक नेत्यांचा मोठा वाटा आहे, मौलाना हुसैन अहमद मदनी व मौलाना अहमदुल्ला शाह यांनीच प्रथम संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती. अनेक मुस्लिम क्रांतिकारकांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, असे दारूल उलूम देवबंदचे प्रवक्ते अशरफ उस्मानी यांनी सांगितले. ' इतर नागरिकांप्रमाणेच आमचंही या देशावर अतिशय प्रेम आहे, आम्हीही याच मातीत वाढलो आहोत. आमच्या देशप्रेमाबाबत जी शंका घेतली जाते, ते गैरसमज आम्हाला दूर करायचे आहेत' असेही ते म्हणाले.