ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - इराकमधील इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेलेला कल्याणचा एक तरूण भारतात परतला आहे. आरिफ माजिद असे त्याचे नाव असून सध्या तो राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे.
कल्याणचा रहिवासी असलेल्या आरिफ माजिदने आणखी तीन तरूणांसह २५ मे रोजी ४0 जणांसोबत इतिहाद विमानाने बगदाद गाठले होते. त्यानंतर हे चौघेही बेपत्ता होते. इराकमध्ये धुडगूस घालत असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेत ते सामील झाल्याची माहिती गेल्या काही दिवसांत पसरली होती. त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक याचा तपास करत होते. २६ ऑगस्ट रोजी सहीम याने त्याच्या भावाला आरिफचा एका बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्याचे फोनवरून कळवले होते. आरिफच्या वडिलांनी मात्र तो जिवंत असल्याचा दावा केला होता. आपल्याला त्याचा फोन आला होता आणि तो भारतात परत येऊ इच्छितो अशी अपेक्षाही व्यक्त केली होती, असेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आज आरिफ भारतात परतला आहे.