ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - गुजरातमधल्या २००२च्या दंगलींसाठी तत्कालिन मुख्यमंत्री व आताचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरता कामा नये असे मत ऑस्ट्रेलियाचे पंतप्धान टोनी अॅबट यांनी व्यक्त केले आहे. मोदी हे त्यावेळी फक्त मुख्य अधिकारी होते आणि अनेक चौकश्यांमध्ये ते निर्दोष आढळले असल्याचेही अॅबट यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मोदींविरोधात असंख्य चौकश्या करण्यात आल्या, ज्यांनी मोदींना निर्दोष जाहीर केले आणि आपल्यासाठी तेवढे पुरेसे असल्याचे ते म्हणाले.
नेत्यांना ज्यावेळी ते प्रमुख पदावर असतात त्यावेळी काही अत्यंत वाईट प्रकारांना सामोरे जावे लागते असे सांगताना, केवळ संबंधित नेत्याला तो प्रमुख आहे केवळ या एकाच कारणास्तव जबाबदार धरणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना दोन वेळा ऑस्ट्रेलियाला गेले होते याची आठवण अॅबट यांनी करून दिली. भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमधील संबंध वृद्धींगत व्हावेत अशी आपली इच्छा असल्याचे अॅबट यांनी स्पष्ट केले. या दोन देशांमधील अणू करारामुळे भारताला युरेनियम हे उणू ऊर्जेसाठी आवश्यक असे इंधन मिळणार असून त्यामुळे भारताच्या ऊर्जेची गरज भागवली जाणार असल्याची शक्यता आहे.
मोदींचा ऑस्ट्रेलियामध्येही चाहता वर्ग असल्याचे सांगताना ते पंतप्रधान झाल्यामुळे ऑस्ट्रेलियातील भारतीयांमध्ये प्रचंड उत्साह संचारल्याचे अॅबट म्हणाले. ऑस्ट्रेलियामध्ये सुमारे ५ लाख भारतीय वास्तव्यास आहेत. मोदी भारतीय अर्थव्यवस्थेला नवी उभारी देतील असा विश्वास ऑस्ट्रेलियातील राजकीय नेत्यांनाही वाटत असल्याचे अॅबट यांनी नमूद केले. भारत हा देश म्हणजे अव्वल दर्जाचा आंतरराष्ट्रीय नागरीक असून या देशाला ऊर्जा देण्याचे काम ऑस्ट्रेलिया करेल अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
जगातले ४० टक्के साठा एकट्या ऑस्ट्रेलियात असलेले केवळ युरेनियमच नाही तर भारताला कोळसा आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यामध्येही ऑस्ट्रेलिया पुढाकार घेईल अशी ग्वाही अॅबट यांनी दिली.