भदोही : उत्तर प्रदेशातील सत्तारूढ समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांनी या खेपेला केंद्रात कोणत्याही एका पक्षाचे सरकार स्थापन होण्याची शक्यता नाकारून आघाडीचे सरकार सत्तारूढ होईल, असे भाकीत येथे केले आहे.एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी येथे भाजपा व काँग्रेस कोणत्याही तर्हेने सत्तेत येऊ इच्छिते, दोन्ही पक्षांना वाटते की तिसर्या आघाडीचे सरकार स्थापन होऊ नये, मात्र तसे होणार नाही. यावेळी तिसर्या आघाडीचेच सरकार केंद्रात सत्तारूढ होईल असे सांगताना त्यांनी आपल्याला एक संधी द्यावी, अशी विनंती मतदारांना केली. केंद्रातील सत्तारूढ सरकारवर टीका करताना मुलायम यांनी हे सरकार प्रत्येक मोर्चावर अपयशी ठरले असून, २८ रुपये खर्च करणारा व्यक्ती गरीब नसतो असे सांगून त्याने गरिबांची खिल्ली उडविली आहे, असे मत व्यक्त केले.माजी संरक्षणमंत्री यादव यांनी देशाच्या सीमेवरून होणार्या घुसखोरीविषयी चर्चा करण्यासाठी दोन मंत्री व अधिकारी आले असता, त्यांना रस्ते व तेथील काटेरी तारांबाबत विचारले असता ते उत्तर देऊ शकले नसल्याचे सांगितले. मुलायम यांनी आपल्या भाषणात शेतकरी व विणकरांना अनेक सुविधा देण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व बेरोजगारांना रोजगार मिळेपर्यंत बेकारी भत्ता देण्याचेही आश्वासन दिले.
या खेपेला तिसऱ्या आघाडीचेच सरकार - मुलायम
By admin | Updated: May 3, 2014 21:44 IST