नवी दिल्ली : ‘फिटनेस’बद्दल गप्पा मारणे ही हल्ली फॅशन झाली आहे. पण त्याने काहीही लाभ होणार नाही. तंत्रज्ञानाने बदलत असलेल्या जीवनशैलीमुळे नानाविध दुर्धर व्याधी अकाली जडू लागल्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी शरीराला रोज नियमित व्यायाम देऊन तंदुरुस्त राहणे हाच रामबाण उपाय असल्याने प्रत्येक नागरिकाने शारीरिक तंदुरुस्ती हा आपल्या जीवनशैलीचा भाग बनवावा, असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘फिट इंडिया’ चळवळीचा शुभारंभ केला.
मोदी यांनी गेल्या आठवड्यातील ‘मन की बात’मध्ये याचे सूतोवाच केलेच होते. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून येथील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधनांनी ‘तंदुरुस्त भारता’चा संकल्प सोडला आणि ही चळवळ लोकचळवळ म्हणून यशस्वी होऊन नागरिक स्वत:सोबतच देशाचेही आरोग्यसंपन्न भवितव्य घडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.केंद्रीय क्रीडा व युवक कल्याणमंत्री किरण रिजिजू यांच्यासोबतच यंदाच्या विविध क्रीडा पुरस्काराने सन्मानित खेळाडूही या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी औपचारिक भाषणंखेरीज भारताच्या पारंपरिक व्यायाम प्रकारांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. गेल्याच आठवड्यात बॅडमिंटनची जगज्जेती ठरलेल्या पी.व्ही. सिधूने यावेळी देशवासियांना ‘तंदुरुस्त भारता’ची शपथ घेण्याचे आवाहन केले.‘फिटनेस’साठी काहीही गुंतवणूक करावी लागत नाही, पण त्याने लाभ मात्र अगणित मिळतात, हे सूत्र अधोरेखित करून मोदी यांनी याकडे लक्ष वेधले की, कोणत्याही क्षेत्रातील यशाचे शारीरिक तंदुरुस्तीशी अतूट नाते असते. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशात तंदुरुस्तीचा मोठा भाग असतो. ‘बॉडी फिट है तो, मार्इंड फिट है’ हे त्याचे कारण आहे, असे ते म्हणाले.
बॅडमिंटन, टेनिस अथवा अथवा अन्य कोणताही खेळ असो आपल्या खेळाडूंच्या कामगिरीने देशाच्या आकांक्षांना नवी भरारी मिळत आहे. त्यांनी मिळविलेली पदके हे केवळ त्यांच्या अपार कष्टाचे फलित नाही तर, ते नवभारताच्या निर्धाराचे ते प्रतिबिंब आहे.-नरेंद्र मोदी, पंतप्रधान